हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील बिज गुणन केंद्र कार्यालयात कार्यरत असलेल्या कृषी पर्यवेक्षकाचा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी उघडकीस आली. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिसांसह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते.
राजेश शिवाजी कोल्हाळ (रा. कोंडवाडा, ता. सेनगाव) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर शहरालगत बिज गुणन केंद्र आहे. या ठिकाणी राजेश कोल्हाळ हे पर्यवेक्षक म्हणून काम करतात. आज सकाळी कोल्हाळ हे नेहमीप्रमाणे कामकाजासाठी आले होते. गुणन केंद्राच्या परिसरात असलेल्या कृषी विभागाच्या शेतातच मशागतीचे काम सुरु होते तर काही मजूर देखील कामावर होते.
रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह खुर्चीत पडून होता –
दरम्यान, आज दुपारी कोल्हाळ हे कार्यालयात काम करीत बसले होते. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्मचारी त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर कोल्हाळ हे रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास देण्यात आली. त्यानुसार पोलिस उपाधिक्षक संदीपान शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र वाघ यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.
वर्षभरापूर्वीच ते हिंगोलीत बदली –
दरम्यान, मयत कोल्हाळ हे सन 2014 पूर्वी कृषीपर्यवेक्षक म्हणून विदर्भात रूजू झाले होते. एक वर्षापुर्वीच त्यांची लातुर विभागात बदली होऊन त्यांना हिंगोली जिल्हा देण्यात आला होता. तर सहा महिन्यापासून ते आखाडा बाळापूर येथील बिज गुणन केंद्रात काम पाहात असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
(Agriculture supervisor killed in government office in Hingoli)