राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून सरकारचा निषेध
कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत उपसभापती सुहास बोराटे यांचा इशारा
कराड – तालुक्यातील गावागावांमध्ये कृषी सहाय्यकांची गरज असते. मात्र हे गावांमध्ये पोहोचतच नाहीत. त्यामुळे अशा कृषी सहाय्यकांना गावातून कायमचे हद्दपार केले पाहिजे, असे सांगत त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा अन्यथा अशा कृषी सहाय्यकांना गावांमध्ये बांधून ठेवू, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे यांनी कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांना दिला. यावर मुल्ला यांनी लवकरच निर्णय घेऊ असे सभागृहात सांगितले.
पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार या होत्या. तालुका कृषी अधिकारी म्हणून रियल मुल्ला यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी त्यांच्या विभागाचा आढावा सादर केला. यावेळी उपसभापती सुहास बोराटे यांनी कृषी सहाय्यक यांचा विषय चर्चेला घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेती उपयोगी साधने वाटप केल्याचे फक्त मीटिंगमध्ये दिसते. ग्रामीण भागातील शेतकरी गट स्थापन करून एकत्र शेती करत आहेत. त्यांना कृषी सहाय्यकांची गरज आहे. मात्र तिकडे कृषी सहाय्यक फिरकत नाहीत हे दुर्दैव आहे.
त्यांना प्रोत्साहन देण्याचे लांबच पण ते मार्गदर्शन करण्यासाठीही येत नाहीत. गावात कोणाला तरी भेटायचं आणि निघून जायचे, आणि सांगायचे भागात आहे. हे पायाला चिखल लावून घेत नाहीत आणि सरकारचा पगार घेतात. त्यांना योग्य शिस्त लावा नाही तर त्यांना गावात बांधून ठेवणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच यांची मिटिंग लावा किंवा यांना तालुक्यातून हद्दपार करा अशी सूचना बोराटे यांनी कृषी अधिकारी मुल्ला यांना केली. यावेळी पंचायत समिती सदस्यांनी देखील याबाबत कृषि सहाय्यकांच्या तक्रारी केल्या.
तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी त्यानंतर आढावा सादर केला. यात कराड तालुक्यात अतिवृष्टी, महापूर झाला. यात 8 हजार 933 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून तालुक्यातील 43 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शासनातर्फे अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे यांचे वाटप करणार आहे. ज्यांनी अर्ज केला होता, त्यातील अर्ज ग्राह्य धरून या मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी कार्यालयात लावण्यात आली असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.
महावितरण ग्रामीणचे एस. एस. जाधव यांनी आढावा सादर केला. कराड ग्रामीणमध्ये 1027 फॉल्टी मीटर बदललेले आहेत. अजून 1200 मीटर बदलणे बाकी असून याचे काम सुरू आहे. मुंढे येथे विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या चार म्हशी व काले येथील शॉक लागून मयत झालेली महिला यांच्या पंचनामा करून तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे अशी माहिती त्यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी त्यांचा आढावा सादर केला. त्यामध्ये तालुक्यातील घरांमध्ये व्यक्तींना विविध आजारांची माहिती तसेच जनजागृती करण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली आहे असे सांगितले. यावर सभापती सौ फरिदा इनामदार यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
कुष्ठरोग तसेच घरात व्यक्तींना विविध आजाराचे माहिती तसेच जनजागृती करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालया तर्फे काही व्यक्तींची नेमणूक केली असून सर्वे करणाऱ्या लोकांना या घटनेचे गांभीर्य नसल्याने सभापतींनी सांगितले. शरद पवार यांनी पन्नास वर्षे राजकारण केले. त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे, तरीही सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारच्या या कृत्या विरोधात ठराव करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांनी सभागृहात केली. यावर गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी आचारसंहिता सुरू आहे, हे सभागृहात सांगणे बरोबर नाही, असे सांगितले. मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, जी कारवाई झाली आहे, ती कोर्टाने केली आहे. त्यामुळे यात सरकारचा काही संबंध नाही. म्हणून सरकारचा निषेध करू नये, असे भाजपचे पंचायत सदस्य बाळासाहेब निकम यांनी सभागृहात सांगितले.