नवी दिल्ली – अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे बिहारमधील वातावरण तप्त बनले आहे. त्या राज्यात भाजपच्या नेत्यांना निदर्शकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर, बिहारमधील भाजपच्या 10 नेत्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने व्हीआयपी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरांवर निदर्शकांनी शुक्रवारी हल्ले केले. त्या घडामोडींची दखल घेऊन रेणू देवी, जयस्वाल आणि भाजपच्या इतर 8 नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. त्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलावर (सीआरपीएफ) सोपवण्यात आली आहे.
संबंधित नेत्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने सशस्त्र कमांडो तैनात करण्याचा आदेश सीआरपीएफला देण्यात आला आहे. अग्निपथविरोधी निदर्शनांची सर्वांधिक धग बिहारमध्ये जाणवत आहे. त्या राज्यात सलग चार दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. निदर्शनांवेळी अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाल्याने बिहारमध्ये तणावाची स्थिती आहे.