पाटणा – जातीच्या आधारावर जनगणना केली जाण्याच्या मागणीवरून बिहारचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भाजपचा या स्वरूपाच्या जनगणनेला विरोध होता अशी चर्चा होती. मात्र नितीश कुमार यांनी हाच विषय लावून धरला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. त्यातही जातीय जनगणनेच्या बाजूने कौल दिला गेल्यानंतर आता मंत्रिमंडळानेही त्यावर मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्या नेत्यांचाही समावेश होता.
दरम्यान, याच विषयावरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही सातत्याने आंदोलने केली आणि मागणी केली त्यामुळे अखेर भाजपला आमच्यासोबत यावे लागले आणि ही मागणी मान्य करावी लागली असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांचा हा दावा भाजपने फेटाळला आहे.
याबाबत बोलताना भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले की, भाजपचा या जनगणनेला कधीच विरोध नव्हता. आमच्या सरकारच्या काळातच विधानसभा आणि विधान परिषदेत दोन दोन वेळा हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सर्व पक्षांची सहमती घडवून आणण्यात आली. राजदच्या राजवटीत ते का झाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.