मुंबई – पाकिस्तानी महिला सीमा हैदर तिच्या देशात परत न आल्यास मुंबईवर पुन्हा 26/11च्या पद्धतीचा दहशतवादी हल्ला होईल, असा इशारा एका कॉल द्वारे दिला गेला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा हा फोन आला, तो उर्दूमध्ये बोलत होता. त्याने म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजधानीवर 26 नोव्हेंबर 2008 सारखा दहशतवादी हल्ला होईल आणि त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल.
हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून, त्याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.हा कॉल एका ऍपद्वारे करण्यात आला होता. पोलिस कॉलरचा आयपी पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
सीमा हैदर या 30 वर्षीय पाकिस्तानी महिलेने मे महिन्यात ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या सचिन मीना या तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. ऑनलाइन गेम खेळताना दोघांची मैत्री झाली होती.
सीमा हैदरला आणि तिचा प्रियकर सचिन मीना या दोघांना स्थानिक पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथे 4 जुलै रोजी अटक केली होती आणि नंतर 7 जुलै रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.नेपाळमार्गे व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी हैदरला पोलिसांनी अटक केली होती.
यूपी पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानेही सोमवार आणि मंगळवारी हैदर आणि सचिन मीना यांची चौकशी केली.एका कट्टरपंथीय संघटनेने या आधीच सीमा हैदरला 72 तासांच्या आत देशाबाहेर काढले नाही तर हल्ल्याची धमकी दिली होती.