मुंबई – मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत बाजी मारत सत्तारूढ भाजपने विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवले. बहुमताचा जादुई आकडा भाजपने पार केल्याने कॉंग्रेसचा भ्रमनिरास झाला.
मध्यप्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला किमान 8 जागा जिंकणे अनिवार्य होते. साहजिकच, भाजप सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या पोटनिवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले. त्या पोटनिवडणुकीत भरीव कामगिरी करत भाजपने 19 जागा जिंकल्या. तर, प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसला 9 जागांवर समाधान मानावे लागले.
अशातच आता मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर महाराष्ट्र भाजपचे नेते नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये आपले काही ‘मित्र’ असल्याचा दावा केला असून ‘त्या’ मित्रांना ते मध्यप्रदेश पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही घडू शकते असं सुचवलं आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
आपल्या ट्विटद्वारे राणे यांनी, “मध्य प्रदेश पोट निवडणुकीच्या निकलांचा एकच संदेश.. आमच्या महा विकास आघाडी मधल्या “मित्रांसाठी”.. ‘ डर के आगे जीत हैं ‘ !!!” असा सूचक संदेश दिला आहे. राणे यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्रात देखील भाजप मिशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
मध्य प्रदेश पोट निवडणुकीच्या निकलांचा एकच संदेश..
आमच्या महा विकास आघाडी मधल्या “मित्रांसाठी”..‘ डर के आगे जीत हैं ‘ !!!
😊😊😊
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2020
दरम्यान, मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहेत. पोटनिवडणुकीत सरशी झाल्याने भाजपचे संख्याबळ आता 126 इतके झाले आहे.
मध्यप्रदेशातील प्रभावी तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडामुळे तेथील कॉंग्रेसचे सरकार काही महिन्यांपूर्वी कोसळले. ज्योतिरादित्य यांच्यापाठोपाठ समर्थक आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला.
ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने विधानसभेच्या 25 जागा रिक्त झाल्या. त्याशिवाय, इतर 3 आमदारांचे निधन झाले. त्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये चमत्कार घडवून पुन्हा सत्तेत परतण्याची आस कॉंग्रेस पक्ष बाळगून होता. मात्र, कॉंग्रेसच्या पदरी निराशा पडली. पोटनिवडणुकीमुळे ज्योतिरादित्य यांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती.
आता पोटनिवडणुकीच्या निकालामुळे त्यांचा भाजपमधील प्रभाव वाढण्यास हातभार लागेल. पोटनिवडणुकीत भाजपने रिंगणात उतरवलेल्या बहुतांश उमेदवारांमध्ये ज्योतिरादित्य समर्थकांचा समावेश होता.