श्रीनगर – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसमध्ये पळापळ सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरमधील सहा माजी आमदारांनी आणि मंत्र्यांनी तत्काळ कॉंग्रेसला रामराम केला आहे. या राज्यात कॉंग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून स्थितीवर चर्चा करण्यासाठी श्रीनगर येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.
ज्या सहा जणांनी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यातील पाच जणांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री जे. एम. सरूरी, विद्यमान उपाध्यक्ष आणि माजी मंत्री हाजी अब्दुल रशीद, माजी आमदार मोहम्मद आमीन भट, गुलजार अहमद वाणी, चौधरी मोहम्मद अक्रम यांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, माजी मंत्री आर. एस. चीब यांनी सोनिया गांधी यांना स्वतंत्र राजीनामा पत्र पाठवले आहे. काश्मीरमध्ये गेल्या काळात जी उलथापालथ झाली ती पाहता येथील जनतेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आझाद यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष ही भूमिका बजावण्यास असमर्थ असल्याचे मला वाटते असे चीब यांनी त्या पत्रात म्हटले आहे.