नवी दिल्ली – योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली या संस्थेने करोनाच्या काळात कारोनील नावाची औषध तयार केले होते. त्यासंदर्भात डॉक्टरांच्या संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका तयार केल्या आहेत. त्या याचिकांवरची आजची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
सर्वोच्च न्यायालयातही याच प्रकारची काही प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत न्यायिक औचित्य आणि शिस्त म्हणून ही याचिका प्रलंबित ठेवली जावी अशी टिप्पणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली. इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्याची प्रत उच्च न्यायालयाने मागवली आहे. या दोन्ही याचिकांत व त्यातील मुद्द्यांत समानता आहे का याची पडताळणी केली जाणार आहे.
करोना झालेल्या नागरिकांचा ऍलोपथीच्या औषधांमुळेच मृत्यू झाला असल्याचा दावा करत बाबा रामदेव गेल्या काही काळापासून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. करोनावर पतंजलीचे कोरोनील हा उपाय आहे हा चुकीचा दावाही त्यांच्याकडून केला जातो आहे.
डॉक्टरांच्या संघटनेची बाजू मांडणारे वकील अखिल सिब्बल म्हणाले की सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत आपल्याला काही कल्पना नाही. मात्र हा जनहिताशी निगडीत विषय असल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने याची सुनावणी घ्यावी. तर सर्वोच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल असल्यामुळे उच्च न्यायालयाने तूर्त सुनावणी थांबवावी अशी विनंती रामदेव बाबा यांच्या वकीलाने केली.