महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एक प्रमुख मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याच्या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना “काळजीपूर्वक बोला’ हा संदेश निश्चितच मिळाला असेल.
व्यासपीठ गाजवणारी भाषणे करणे हा राजकीय नेत्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असला, तरी आता गेल्या काही कालावधीमध्ये लोकांच्या अस्मिता अतिशय जागृत झाल्या असल्याने व्यासपीठावर आपण काय बोलतो आणि त्याचा निश्चित अर्थ काय घेतला जाईल आणि त्याचा परिणाम कशा प्रकारे होईल, याचा विचार आता बोलण्यापूर्वीच सर्व राजकीय नेत्यांना करावा लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातही केवळ विविध व्यक्तींनी केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादविवादांचीच चर्चा आहे. या वादविवादांमुळे नंतर झालेल्या आंदोलनाची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे. जर राजकीय नेत्याने व्यासपीठ गाजवण्याच्या नादात किंवा बोलण्याच्या भरात एखादे विधान केल्यानंतर ते विधान वादग्रस्त ठरू शकते याची जाणीव झाल्यावर सारवासारव केली जाते आणि क्वचित प्रसंगी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली जाते.
चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा आपण जे विधान केले होते त्याबाबत नंतर दिलगिरी व्यक्त केली होती. पण अशा प्रकारची दिलगिरी स्वीकारण्याची कोणाचीच मानसिकता नसल्याने शाई फेकण्यासारख्या किंवा वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यासारख्या घटना अपरिहार्य मानाव्या लागतात. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात महापुरुषांबाबत उलट सुलट किंवा चुकीची विधाने करण्याची जणू काही चढाओढच लागली आहे. अशा प्रकारची विधाने करणारे राजकीय नेते जाणीवपूर्वक या गोष्टी करतात असे नाही; पण आपण जे बोलतो आहे ते योग्यच आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याने अशा प्रकारच्या चुका केल्या जातात. अनेक वेळा भाषेच्या फरकामुळेसुद्धा एखाद्या नेत्याने केलेले विधान अपमानास्पद वाटू शकते. भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे केवळ त्यांच्या बोलीभाषेतील फरकामुळे दोन-तीन वेळा अशाच प्रकारे अडचणीत आले आहेत.
एखाद्या भागामध्ये वापरला जाणारा एखादा शब्द हा तेथील दैनंदिन बोलीभाषेतील एक सहज मान्य आणि स्वीकारहार्य असा शब्द असू शकतो; पण तोच शब्द महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मात्र अपमानास्पद वाटू शकतो. बोलताना एखाद्याचा एकेरी उल्लेख करणे एखाद्या प्रांतातील बोलीभाषेचे वैशिष्ट्य असू शकते. पण असा एकेरी उल्लेख इतरांना चुकीचा आणि अपमानास्पद वाटू शकतो. या सर्व गोष्टींचे भान आता व्यासपीठावर भाषण ठोकताना राजकीय नेत्यांना ठेवावे लागणार आहे. सर्वच राजकीय पक्ष नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी किंवा काही प्रमुख राजकीय नेत्यांसाठी बोलावे कसे? याबाबतचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत असतात. भारतीय जनता पक्षासारख्या नियोजनबद्ध पक्षांमध्ये तर अशा प्रकारची शिबिरे सतत सुरू असतात. अर्थात, अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये एखाद्या विषयावर कशा प्रकारची भूमिका घ्यावी याबाबत जास्त प्रबोधन केले जाते; पण आपल्या एखाद्या विधानामुळे कोणते वाद निर्माण होऊ शकतात याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण किंवा प्रबोधन राजकीय नेत्यांना दिले जात नाही. आगामी कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना आता अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आणि प्रबोधनाची गरज भासणार आहे, हे निश्चित दीर्घकाळ राजकारणात असणारा आणि अनेक महत्त्वाची पदे भूषवणारा एखादा नेता जाणीवपूर्वक कोणताही वाद कधीही अंगावर ओढवून घेणार नाही.
अनावधानाने किंवा बोलण्याच्या भरात केलेले एखादे विधानही आपल्याला अडचणीत आणू शकते याची जाणीव आता सर्वच राजकीय नेत्यांना झाली असेल. कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणासोबत केली होती. तेव्हासुद्धा वाद निर्माण झाला होता. राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेला विधानांमुळे वाद वाढला होता. सावरकरांवरील टीकेला उत्तर देताना भाजपच्या नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर खालच्या पातळीवर टीका केली होती. अशा प्रकारे विनाकारण निर्माण होणाऱ्या वादामुळे सामाजिक वातावरण काही काळ गढूळ होते आणि क्रियेला प्रतिक्रिया या माध्यमातून हा वाद दीर्घकाळ विनाकारण चालूच राहतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि विविध संस्कृतीने सजलेल्या देशांमध्ये निश्चितच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक प्रदेशांमध्ये अस्मितेचे विषयही वेगवेगळे आहेत.
महापुरुष असोत किंवा राजकीय नेते असोत किंवा विशिष्ट संस्कार असोत त्याबाबत जर विरोधी मत व्यक्त झाले तर या अस्मिता निश्चितपणे दुखावल्या जातात आणि त्याबाबत विरोधी भावनाही व्यक्त केली जाते. विरोधी भावना व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचा अजूनही त्यांना त्रास होत आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. एखाद्या चुकीच्या विधानामुळे अशा एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा खराब होण्याचा धोकाही आता लक्षात घ्यायला हवा. महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची माहिती देताना नेहमीच त्यांच्या तीन माकडांचा उल्लेख केला जातो. “वाईट पाहू नका, वाईट बोलू नका आणि वाईट ऐकू नका’ अशा प्रकारचा संदेश देणारी ही महात्मा गांधीजींची माकडे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी वाईट किंवा चुकीचे बोलू नका हा संदेश आता राजकीय नेत्यांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. व्यासपीठावर बोलताना भान राखले नाही किंवा सभा गाजवण्याच्या नादात वाटेल तशी विधाने केली तर ती अंगाशी येऊ शकतात, हे आता सर्वच राजकीय पक्षांना व त्यांच्या वक्त्यांना लक्षात घ्यावे लागणार आहे.