लोणावळा, (वार्ताहर) – सहारा पुलाच्या बाजूला असलेल्या भुशी गावातील सर्वे नं. 54/2 मध्ये राहणाऱ्या प्लॉटधारक रहिवाशांनी स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी न्यायहक्काचा रस्ता मिळावा म्हणून बुधवारपासून सुरू केलेले उपोषण मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर शुक्रवारी मागे घेण्यात आले.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा घडवून आणली. त्यानंतर नगरपरिषदेच्या स्थायी समिती हॉलमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत उपोषणकर्त्यांच्या दोन मागण्यांसंदर्भात चर्चा केली गेली.
उपोषणकर्त्यांच्या प्लॉटपर्यंत जाणाऱ्या पहिल्या रस्त्यावर मिस्टी मिडॉज या हॉटेलधारकाने उच्च न्यायालयात स्थगिती ऑर्डर घेतल्याने सद्यःस्थितीत या स्थगितीवर अंतिम निर्णय होत नाही तोवर नगरपरिषदेला कोणत्याही स्वरूपाची कारवाई करता येणार नसल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. मात्र याबाबत आतापर्यंत या प्रकरणी नगरपरिषदेची बाजू न्यायालयात मांडायची राहिली होती, ती बाजू लवकरात लवकर मांडून सदरचा स्थगिती निकाली काढून त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. तसेच पर्याची मागार्चाही विचार करू असे सांगितले.
या वेली सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर, भाजपचे प्रदेश सदस्य आशिष बुटाला, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, दत्ता येवले, अशोक ढाकोळ, उपोषणकर्त्या विदुला वर्तक, मोहसीन संगे, नंदकुमार वर्तक, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, नगरविकास अधिकारी अतुल केंद्रे आदी उपस्थित होते.
सर्वे नं. 54/2 मध्ये राहणारी 40 पेक्षा अधिक कुटुंब आणि प्लॉटधारक मागील चार ते पाच वर्षांपासून आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून नगरपरिषद, रेल्वे विभाग, न्यायालय असा लढा लढत आहे. एकीकडे मिस्टी मिडॉज या हॉटेलच्या बाजूने जाणारा रस्ता स्टे ऑर्डर आल्याने व दुसरीकडे सर्वे नं. 53 या जागेत तेथील जागा मालकाने भिंत बांधत या जागेतून पुढे सर्वे नं. 54/2 कडे जाणारा रस्ता बंद केल्याने सर्वे नं. 54/2 मध्ये राहणाऱ्या प्लॉटधारक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी रहिवाशांनी मागील तीन दिवसांपासून रस्ता खुला करून द्यावा, या मागणीसाठी लोणावळा नगरपरिषद आणि रेल्वे विभागाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोषण सुरू केले होते.