मुंबई – सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार ‘मुक्ता टिळक’ यांचे नुकतंच (गुरूवारी) निधन झाले आहे. कर्करोगाने खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादीच्या नेत्या ‘रूपाली ठोंबरे पाटील’ यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे’. असं त्या म्हणाल्या आहेत. यावेळी रूपाली ठोंबरे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. मात्र, त्यांच्या या विधानानंतर पक्षाने त्यांना घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
“मुक्ता टिळक किंवा एखाद्या दिग्गज नेत्याचं निधन झाल्यावर त्यांचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच पोट निवडणुकीची चर्चा सुरु आहे, हे अत्यंत चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. पक्षातील कोणीही काहीही चर्चा करु नये. हे खपवून घेतलं जाणार नाही’. असं राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
रूपाली ठोंबरे पाटील नेमकं काय म्हणाल्या होत्या…
यावेळी त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. मुक्ताताईंच्या नंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणीही नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगा सुद्धा लहान असून त्याचं नुकतंच लग्न झालं आहे.’ असं वक्त्यव्य त्यांनी केलं होत. दरम्यान, त्यांच्या या विधानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून वरिष्ठांना न विचारताच आपली भूमिका मांडल्यामुळे शहरातील पदाधिकारी देखील आता त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून आलं आहे.