मुंबई: करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे व्हेरियंट असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण राज्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. या प्रकारांचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश टोपे यांनी नव्या व्हेरियंटविषयी बोलताना, “मुंबईत काल अचानकपणे ५०० रुग्ण वाढले आहेत. क्लस्टर भाग असणाऱ्या ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणीदेखील संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आज ज्या ३० ते ४० हजार चाचण्या आम्ही करत आहोत त्या वाढवाव्या लागतील. क्लस्टर जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. काळजी करण्याचं, घाबरण्याचं सध्या काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
“संख्या वाढत आहे तिथे लोकांनी प्रसार होऊ नये यासाठी मास्क वापरत काळजी घेण्याची गरज आहे,” असे आवाहनही राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. विषाणूचा नवा प्रकार आढळला असला तरी हा प्रकार ओमायक्रॉन प्रकारातील असल्यामुळे सध्या तरी त्याचा फारसा धोका नाही. तसेच रुग्णसंख्या वाढत असली तरी ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग कमी आहे.
पुढील काही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत राहील, परंतु रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण कमी राहिल्यास चिंतेचे कारण नाही. या दृष्टीने या दोन्ही बाबींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. बीए.४ आणि बीए.५ हे ओमायक्रॉनचे प्रकार आहेत. या प्रकारच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग लक्षणीय असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुग्णआलेखावरून आढळले आहे.