मुंबई : कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड येथील पूरस्थितीने रौद्र रुप धारण केले आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने परिस्थिती आणखीन बिकट होत असल्याचे दिसत आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात ढगफुटी झाल्याने कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. नदीकाढची अनेक गाव पाण्याखाली गेली आहेत. माडखोल, सावंतवाडी आंबोली मार्गावर तीन ते चार फूट पाणी आले आहे. दोडामार्ग तिलारी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. कोकणातील चिपळूण, महाड आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
आयर्विन पुलाची पाणीपातळी 38 फुटांवर पोहोचली आहे. शहरातील 50 कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या उपनगरात पाणी शिरले आहे. तर अनेक नागरिकांनी स्वतः स्थलांतर सुरु केले आहे.
कोयना धरण क्षेत्रात तुफान पाऊस सुरु असल्याने धरणातून विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, दत्तनगर परिसर या भागात पुराच पाणी शिरल्याने नागरिकांत भीतीचे वातावण पसरले आहे.