गडचिरोली: राज्यातील करोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत असताना ठाकरे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवली. चंद्रपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. या विषयीचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
चंद्रपूरची दारुबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनाही दारूबंदी उठवणार असल्याच्या आशा आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घ्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर वडेट्टीवार यांनी दारुबंदीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागली.
दारुबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे काहीही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही. तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी तिखट टीकाही त्यांनी केली.
चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली, तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या दारुबंदीला उठवण्याची एकप्रकारे तयारीच केल्याचे दिसून येते.