भाळवणी -पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण ओव्हर फ्लो झाले. तब्बल 10 वर्षांनंतर काळू प्रकल्प पावसाळ्याच्या सुरूवातीला भरल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. काळू प्रकल्प झाल्यानंतर ओव्हर फ्लो होण्याची आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे, अशी माहिती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील काळू धरणाची एकूण साठवण क्षमता 299 दशलक्ष घनफूट असून, या धरणातून ढवळपुरीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांसह अनेक गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.
याशिवाय पळशी 29.82, तिखोल 21.20, भाळवणी 6.22, ढोकी नं.1 6.77, ढोकी नं.2 10.44 दशलक्ष घनफूट पाणी या तलावांत आहे. अजून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
काळू प्रकल्प 2011 व 2017 साली पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्याबरोबर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगामातील ज्वारी, वाटाणा, टोमॅटो आदी पिके शाश्वत झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.