काबुल/नवी दिल्ली – अफगाणिस्तानने नवी दिल्लीतील आपला दूतावास कायमचा बंद केल्याचे जाहीर केले आहे. अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटिक मिशनने स्टेटमेंट जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. नवी दिल्लीतील दूतावास बंद करण्याचा त्यांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2023 पासून लागू होईल. अफगाणिस्तान सरकारचे म्हणणे आहे की त्यांना भारत सरकारकडून सतत आव्हानांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
30 सप्टेंबरपासून नवी दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावासाचे कामकाज बंद आहे. अफगाणिस्तानला भारत सरकारकडून सहकार्य मिळू शकले नाही. त्यानंतर आठ आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “व्हिएन्ना कन्व्हेन्शन 1961′ नुसार अफगाण दूतावासातील मालमत्ता, बॅंक खाती, वाहने आणि इतर मालमत्ता त्यांना ताब्यात देण्याची मागणी भारत सरकारकडे करण्यात आली आहे. अफगाणिस्ताननेही मिशनच्या बॅंक खात्यांमध्ये सुमारे पाच लाख डॉलर्स ठेवल्याचा दावा केला आहे.
भारत सरकारचे आभार व्यक्त केले
धोरणे आणि हितसंबंधांमधील मोठे बदल लक्षात घेऊन भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारनेही दूतावासाला पाठिंबा दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले आहेत. गेल्या दोन वर्ष आणि तीन महिन्यांत भारतात अफगाण लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि ऑगस्ट 2021 च्या तुलनेत हा आकडा निम्म्यावर आला आहे आणि या कालावधीत खूप कमी संख्येने नवीन व्हिसा जारी करण्यात आले आहेत. शेवटी, 30 सप्टेंबर रोजी, अफगाणिस्तान दूतावासाचे कर्मचारी अमेरिका किंवा युरोपला रवाना झाले.