सातारा मतदारसंघातील चर्चा; तेल गेलं… तूप गेलं… हाती धुपाटणं आलं…!
सातारा – काही जुन्या म्हणी खूपच बोधप्रद असतात. त्यातील एका म्हणीचा चांगलाच प्रत्यय सातारकरांना आणि खास करुन सातारा लोकसभा मतदारसंघाला येतोय. “तेल गेलं, तूप गेलं… हाती धुपाटणं आलं’ या आशयाच्या म्हणीची चर्चा सध्या सातारा शहरासह लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आहे.
पाच महिन्यांपूर्वी खासदार झालेल्या उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत पुन्हा सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला. स्वत:ला अतिविद्वान समजणाऱ्या तिघांचे ऐकून खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंची खासदारकी गेली.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सलग तीन टर्म खासदार होणाऱ्या उदनराजेंवर आज भलतीच वेळ आली आहे. राष्ट्रवादीतील आमदारांचा आणि बड्या नेत्यांचा विरोध असतानाही शरद पवारांनी उदयनराजेंनाच खासदारकीचं तिकीट दिलं. भाजपची पुन्हा लाट असतानादेखील उदयनराजे खासदार झाले. पण, मताधिक्य घटल्याने त्यांनी अंगावर गुलाल घेतला नाही. उदयनराजेंनीही मतदारसंघातील काही भागात दौरा करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, काही दिवसांतच उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि भाजपची कास धरली. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता, त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची शिवेंद्रराजेंसोबत वाढलेली सलगी यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिवेंद्रराजे यांचे वर्चस्व वाढणार हे निश्चित होते. सातारा तालुका आणि प्रामुख्याने शहर म्हटलं की उदयनराजे विरुध्द शिवेंद्रराजे अशी वर्चस्वाची लढाई अनेकदा दिसली आहे.
भाजपच्या ताकदीमुळे शिवेंद्रराजेंचे महत्व वाढणार, ते भाजपमधून आमदार झाले की मंत्री होणार, अशा गणितामुळे साहजिकच उदयनराजेंच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरु लागले. त्रिकुटाला शिवेंद्रराजेंचे भाजपमध्ये जाणे स्वत:साठी चिंताजनक वाटू लागले आणि त्यांनी उदयनराजेंपुढे भाजप प्रवेशाचा तगादा लावला. भाजपमधून तुम्ही पुन्हा खासदार व्हाल, मंत्री व्हाल, असा भुलभूलैय्या निर्माण करुन त्रिकुटाने उदयनराजेंची दिशाभूल केली. नेहमीच त्रिकुटाचे ऐकणाऱ्या उदयनराजेंनी खासदारकीचा राजिनामा दिला आणि ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले.
विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यासोबत सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक लागली. काहीही झाले तरी उदयनराजे निवडून येणारचं, अशा आविर्भावात त्रिकुट वावरत राहिले. वास्तवतेपासून उदयनराजे पूर्णपणे गाफिल राहिले. राष्ट्रवादीतून लढताना उदयनराजेंच्या निवडणूक कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा राबता असायचा. पोटनिवडणुकीवेळी मात्र एक विद्वान कार्यालयात तळ ठोकून असायचा. बोटावर मोजण्याइतकेच लोक येजा करायचे. यावरुनच निकालाचे चित्र स्पष्ट होत होते.
मात्र, उदयनराजेंच्या पुढे मोठमोठी स्वप्ने उभी करण्यात आली होती आणि आपण निवडणूक अगदी सहज जिंकू आणि दीड लाखाच्या वर मताधिक्य मिळवू, असा फाजिल आत्मविश्वास त्रिकुटाकडून व्यक्त व्हायचा. या अतिविद्वान समजणाऱ्या बगलबच्च्यांनी उदयनराजेंपर्यंत खरी वस्तुस्तिथी पोहचवलीच नाही. निवडणुकीत उदयनराजेंचे अवघड आहे, अशी चर्चा मतदरासंघात झडत असताना त्रिकुट मात्र उदयनराजेंच्या भोवती मंत्रिपदाचे डोंगर उभे करत राहिले. अगदी सहज देशात एक नंबरच्या लीडने, अशी वाक्ये या त्रिकुटाच्या तोंडातून सातत्याने बाहेर पडत होती.
प्रचारादरम्यान सातारा शहरात शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रमाणावर आघाडी घेतली होती, त्याप्रमाणात उदयनराजेंचे काही ठराविक मोजके कार्यकर्ते सोडले तर, कोणीही फिरताना दिसत नव्हते. त्रिकुटाच्या नादाला लागून नसती आफत ओढवून घेतली, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उमटत होती. खासदारकीही गेली आणि मंत्रिपदाचे स्वप्नही भंगले, अशी चर्चा निकालापासून मतदारसंघात झडत आहे.