वाई – हल्ली सर्व ठिकाणी वाढदिवस साजरा करताना लोकांना पार्ट्या देऊन अनाठायी खर्च केला जातो; पण विधायक काम करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्या वाढदिनी त्यांचे पती संतोष जगताप आणि उभयतांच्या पाच मित्रांनी एकाच वेळी अवयवदान व देहदानाचे फॉर्म भरून आपल्या मैत्रिणीला वाढदिवसाची आगळीवेगळी भेट दिली. विद्या पोळ यांनी त्यांनी स्वत:देखील हा फॉर्म भरला.
मृत्युपश्चात शरीर जाळून वाया घालवण्यापेक्षा इतरांच्या उपयोगी पडता यावे, याचा आदर्श या सर्वांनी समाजापुढे ठेवला आहे. एका देहदानामुळे 43 रुग्णांना फायदा होऊ शकतो आणि काही कारणांनी अवयव निकामी झाले तरी ते वैद्यकीय संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतात. एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कारामुळे होणारे प्रदूषण व पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचा विचार करून या सर्वांनी हा निर्णय घेतला.
विद्या पोळ, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष जगताप, वस्तू व सेवाकर उपायुक्त अंजली रसाळ-ढमाळ, कोरेगाव तालुक्यातील आदर्श शिक्षक दाम्पत्य राम पवार व सौ. अर्चना पवार, पाटण तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक व संस्कारदीप व इतर शालोपयोगी पुस्तकांचे लेखक दीपक मगर व त्यांच्या पत्नी व शिक्षिका सुमती मगर हे सर्व वर्गमित्र असून ते गेली 25 वर्षे एकत्रितपणे सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत. ही मैत्री मृत्युनंतरही अबाधित रहावी, अशी त्यांची इच्छा आहे.
आतापर्यंत अनेक शाळांमधे साहित्यवाटप, देणग्या, जुन्या प्रथा, परंपरांविषयी सामाजिक जागरूकता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध अभियानांतर्गत श्रमदान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अशा उपक्रमांद्वारे हे सर्वच जण सतत सामाजिक कार्य करत आहेत. या सर्व कामांवर अवयवदान व देहदानाने कळस चढवला जाणार आहे. “मरावे परि अवयवरूपी उरावे’ ही उक्ती सार्थ ठरवचत एकाच वेळी सात जणांनी आपली इच्छापत्रे भरून देण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. याबद्दल विविध स्तरातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अवयवदान व देहदान करण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी. मृत्युनंतर केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार व धार्मिक विधीमागच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, यासाठी स्वत:पासून परिवर्तन करणे गरजेचे आहे. याच भावनेतून या ग्रुपमधील सदस्यांनी घरातील अनेक धार्मिक विधींना पुरोगामी व पर्यावरणपूरक स्वरूप देण्याचे काम केले आहे. प्रत्येक जण आपल्या कार्यक्षेत्रात, वेगवेगळ्या स्वरूपात सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत आहे. त्यामुळे या मित्रपरिवाराचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत विद्या पोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.