– दीपक येडवे
वीसगाव खोरे – वेळू (ता. भोर) येथील शेतकरी गुलाब महादेव घुले आणि प्रसाद गुलाब घुले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक शेती करत विषमुक्त शेती केली आहे.
तीन एकर शेतीसाठी बोअरवेल, 50 लाख लीटर क्षमता असलेले शेततळे घेतले आहे. शेतावर 2 देशी गायीचे सहाय्याने 3 एकर क्षेत्र पिकवित आहे. जीवामृत, घनजीवामृत, बिजामृत, आच्छादन, पुरेसे पाणी या पंचसूत्रीतून शेती समृद्ध केली आहे.
गायींमुळे दुधाला प्रतिलिटर 85 रुपये दर मिळतो. तूपला प्रतिकिलो 3 हजार रुपये दर मिळतो. शेतात मुलगा, आई, पत्नी, सासू यांची मदत होते आहे. मिश्र पिके घेत असल्याने महिना सरासरी खर्च वजा जाता 25 ते 27 हजार रुपये उत्पन्न होते.
शेतात पाणी टिकण्यासाठी आच्छादन
झाडाच्या अथवा रोपाच्या आजूबाजूचा भाग, पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, धान्याची टरफले, उसाची चिपाडे, गहू, सोयाबीन, कडधान्यांचे भुसकट, भाताचा कोंडा, पिकांचे वाढलेले अवशेष, गुरांच्या उष्टावळ, वाळलेले निकृष्ट गवत वापरून जमिनीचा पृष्ठभाग झाकून आच्छादन केल्यास पिकांना दिलेले पाणी आणि ओलावा सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन जमिनीतून उडून जाणारे पाणी थांबते. आच्छादनावर आठवड्यातून किंवा 15 दिवसांतून एकदा 10 पट पाण्यात पातळ केलेले जीवामृत शिंपडले की, त्याची विघटनाची प्रक्रिया जलद होते आणि त्याचे ह्युमसमध्ये (काळ्या भुसभुशीत आणि सुपीक मातीत) रूपांतर होते. पिके जोमदार वाढतात.
शेवगा शेंगेची गिनिजमध्ये नोंद
शेतावर नवीन केलेल्या प्रयोग ऊत्पादनामुळे शेती पहाण्यासाठी लंडन, इटाली, कतार व इतर आखाती देशातील शेतकऱ्यांनी शेतीला भेट दिली आहे. साडेचार फूट तीन इंचाची शेवगा शेंगेने केलेले गिनीज बुक वल्ड रेकॉर्ड नोंद करण्यात आली आहे.
दूध 85 रुपये, तूप 3 हजार रुपये किलो
फळझाडांची लागवड करून वनभिंत तयार केल्यामुळे वादळी वाऱ्यापासून संरक्षण मिळते. या झाडांची वाऱ्याच्या विरूध्द बाजूला लागवड केल्यामुळे परागीभवनाचा वेग वाढल्याने आंतरपिकांना त्याचा फायदा होत आहे. 20 गुंठ्यात मिश्र भाजीपाल्यासह स्वीटकॉर्न, झेंडू फूलांची लागवड केली. दहा गुंठ्याचे शेततळे, 30 गुंठ्यात रायपूर आणि ललित गोल गुलाबी पेरूची 150, अंजिराची 70, सफरचंद 3, सीताफळ 30 झाडे लावली आहेत. 10 गुंठे शेडनेट काकडी, सिमला मिरची, काटे वांगी, चेरी टोमॅटो, टोमॅटो पीक घेतले आहे. नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या पालेभाज्यांची पुण्यात ऑनलाइन विक्री होते, त्यामुळे विक्रीसाठी माल नेण्याचा खर्च कमी होतो आहे.