मुंबई – राज्यातील सरकार बदलल्यानंतर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी मला अडवण्याचा प्रयत्न केला. सध्या राज्यासह मुंबई महापालिकेत दडपशाही आणि हुकूमशाहीखाली अधिकारी काम करत आहेत. सध्या फक्त टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास या तीन गोष्टी सध्या सुरू आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगाविला.
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि हे खोके सरकार आल्यानंतर जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वत: घोषणा केली होती की, मुंबईच्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी 5000 कोटी रुपये दिले जातील. 5000 कोटी दिल्यानंतर रातोरात मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी 5000 कोटींचे टेंडर काढले, परंतु, मागील 10 ते 15 दिवसांपूर्वीच हे टेंडर रद्द करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांचे काय होणार, याबाबत कोणालाच माहिती नाही. मुंबई महापालिकेत आम्ही प्रत्येक वर्षी दोन ते अडीच हजार कोटीचे टेंडर काढत असतो. टप्प्याटप्प्याने ते काम करत असतो. मुख्यमंत्री सांगत असतील की, रस्ते रातोरात खड्डेमुक्त करतो, तर असे कुठेही होत नाही. एकाच वेळी सर्व रस्त्यांचे काम करता येत नाही. त्यामुळे 5000 कोटींचे रस्ते हे बनवणार कसे, कधी आणि किती वेळात रस्ते खड्डेमुक्त करणार यांसारखे अनेक प्रश्न पडले होते.
सरकारला माहीत होतं की नाही माहीत नाही. त्यामुळे सरकार खोटं बोलतंय हे समजत होतं. रस्त्याखाली 42 युटीलिटी असतात. मुंबईत 16 प्लॅनिंग एजन्सी असतात आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन काम करावं लागतं. हे या सरकारला माहीतच नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
तसेच खोके सरकारमुळे पाच उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. पंचनामे झाले नाही. निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक व्हावी लागते तिही झाली नाही. तरीही खोके सरकार राजकारणावर फोकस आणत आहे, अशी टीका त्यांनी केली.