सूरत – भारताला जोडण्यासाठी म्हणून राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी निघाले पण त्या यात्रेचा परिणाम देश तोडण्यासाठीच होताना दिसतो आहे अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जे. पी. नढ्ढा यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानांवर प्रतिक्रीया देताना नढ्ढा बोलत होते. ते म्हणाले की, कालच राहुल गांधींनी वीर सावरकरांविरोधात निंदनीय विधान केले आहे. यावरून त्यांची विचारसरणी काय आहे, हे दिसून येते. “ते भारताला जोडण्यासाठी बाहेर पडलेले नाहीत, ते तोडण्यासाठी बाहेर पडले आहेत,” असे नड्डा गुजरातमधील एका निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले.
संसद हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या अफझल गुरूला फाशी देण्यास विरोध करणाऱ्यांसोबत गांधी उभे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये; फडणवीसांचा राहुल गांधींना थेट इशारा
दरम्यान, गुजरातमधील भावनगर येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असताना देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा दिली आहे. त्यांची यात्रा राज्याबाहेर सुरक्षितपणे पाठवू. पण त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये, असा इशारा त्यांनी दिला.