Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले. मोठ्या संघर्षानंतर उभारण्यात येणाऱ्या मंदिरासाठी देशभरातील नागरिक उत्सुक आहेत. भारतातच नाही तर जगभरात यानिमित्त आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारकडून 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याला विरोध करत विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीहोती. मात्र ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे रविवारी विशेष सुनावणी झाली. सत्यजीत साळवे, वेदांत अग्रवाल, शिवांगी अग्रवाल व खुशी बांगीया या महाराष्ट्र आणि गुजरातमधील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. अचानक दिलेल्या सार्वजनिक सुट्टीमुळे शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसेच बँका बंद असल्याने आर्थिक फटकाही बसत असल्याचा दावा केला गेला होता.
मुंबई उच्च न्यायलयाने याचिकाकर्ता विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले आहे. जनहित याचिकेचा वापर काळजीपूर्वक करायला हवा, केवळ प्रसिद्धीसाठी त्याचा वापर होऊ नये. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही याचे भान राखले पाहिजे. विधी शाखेचे विद्यार्थी या नात्यानं कुठल्या निर्णयाला आव्हान देतो येतं याची तुम्हाला कल्पना आहे का? ज्याआधारे राज्य सरकारने ही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे त्याआधारावर तुमचा युक्तिवाद विचारात घेणे योग्य ठरणार नाही, असे हायकोर्टाने म्हंटले आहे.