-पडल्यास उत्पादनात वेगात होऊ शकते वाढ
-भारताला वर्षाला लागतात 2 कोटी 40 लाख गोळ्या
-वर्षाला देशाची 20 कोटी गोळ्या तयार करण्याची क्षमता
नवी दिल्ली : देशांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा देशाला पुरेल एवढा साठा असल्याचे भारतातील औषधी कंपन्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जर गरज पडली तर देशांतर्गत मागणीसाठी आणि निर्यातीसाठी औषधाचे आणखी उत्पादन वेगात केले जाऊ शकते असे या कंपन्यांनी म्हटले आहे. बऱ्याच देशांनी भारताकडे या औषधाची मागणी केल्यानंतर काल भारताने या औषधाच्या निर्यातीवरील बंदी काही प्रमाणात उठविली आहे. 25 मार्च रोजी भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारत जगातील जवळजवळ 70 टक्के हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध तयार करतो. त्याचबरोबर निर्यातीमध्ये भारताचा सर्वात मोठा वाटा आहे.
औषधी कंपन्यांच्या संघटनेचे महासंचालक सुदर्शन जैन यांनी सांगितले की, भारतातील बऱ्याच कंपन्या या औषधाची निर्मिती गेल्या अनेक दशकापासून करीत आहेत. सध्या देशामध्ये पुरेल एवढा औषधाचा साठा आहे. त्याचबरोबर वेगात उत्पादन वाढविण्याची या कंपन्यांची क्षमता आहे.
भारताला सर्वसाधारणपणे वर्षाला 2 कोटी 40 लाख गोळ्या लागतात. तर भारताची क्षमता वर्षाला 20 कोटी गोळ्या तयार करण्याची आहे.
त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही. अशा अवस्थेतही बंदी का घालण्यात आली होती असे विचारले असता त्यांनी सांगितले की याबाबत उगीच संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये याकरिता आहे बंदी घालण्यात आली होती. आता प्रत्येक देशाच्या मागणीनुसार विचार करून निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे. करोनाव्हायरसची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी निर्यातीसाठी या औषधाच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. त्यामुळे निर्यातिच्या ऑर्डर पूर्ण करण्याची या कंपन्यांची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सर्वसाधारणपणे वर्षाला 5. 50 अब्ज डॉलरची या औषधाची निर्यात करतो.