मुंबई- गेल्या 24 तासात मुंबईत 100 पेक्षा बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा लॉक डाऊन आवश्यक असल्याचे मत राज्य सरकारच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे, असे वृत्त रॉयटर या वृत्त संस्थेने दिले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या बुधवारी 60ने वाढल्याने एकूण करोनाग्रस्तांची संख्या राज्यात 1078 वर पोहोचली. तर बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात 44, पुण्यात नऊ, नागपुरमध्ये चार तर अहमदनगर, अकोला आणि बुलढाण्यात एक बाधित सापडला.
गेल्या 24 तासांत देशांत 773 नवे बाधित सापडले असल्याने देशातील बाधितांची संख्या पाच हजार 194 वर पोहोचली. तर 441 बाधित पूर्णत: ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या चार हजार 643 आहे. तर देशांत 24 तासांत 10 जण मरण पावले असल्यामुळे मृतांची संख्या 149 वर पोहोचल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.