जयेश राणे
व्यसन मुक्त राहून शरीराची काळजी घेण्यातच हित आहे. व्यसन करून आजपर्यंत कोणाचेही भले झालेले नाही. सर्वकाही धुळीस मिळाले आहे. त्यामुळे व्यसन मुक्त राहून जीवन समाधानी बनवले पाहिजे. हे व्यसन थोडेही नको आणि मोठेही नकोच. त्याला हद्दपार करण्यातच हित आहे.
दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन माणसाला हिंसक बनवते. व्यसन करण्यात खंड पडू नये, याची त्या लोकांना अचूक जाणीव असते. मात्र त्यातून बाहेर पडले पाहिजे, व्यसन आपल्या शरीरासह कुटुंबातील सदस्यांचेही नुकसान करत आहे हा विचार तर लांबच राहतो. कुटुंबातील एका व्यक्तीच्या वाईट सवयीमुळे आजपर्यंत अनेक कुटुंब त्रासली गेली आहेत.
व्यसनी लोकांमुळे कुटुंबीय त्रस्त असतातच, तसेच शेजारीही त्याला वैतागलेले असतात. शेजाऱ्यांना तर ही नाहक शिक्षाच म्हणावी लागेल. व्यसन कोणाचे आणि शिक्षा कोणाला, असे म्हणता येईल.
व्यसनी व्यक्ती व्यसन करत असताना इतरांना त्रास देतच असते. मात्र ती व्यसनामुळे आजारी पडल्यावर कुटुंबाला अधिक खर्चाच्या दरीत ढकलते. अनेकांचे लिव्हर, किडनी ही व्यसनामुळे निकामी होतात. या महत्त्वाच्या अवयवांसह शरीराच्या कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम करतात. असे असले तरी जिभेचे चोचले पुरवण्यापुढे हात टेकले जातात. व्यसन केल्यावर स्वतःवर नियंत्रण न राहिल्याने जिभेची धार अधिक वाढते. म्हणजेच अनावश्यक बडबड चालू होते आणि ती इतरांचे मन दुखावते.
ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. याविषयी त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. एखादी बाब आपला संसार उद्ध्वस्त करते तर तिलाच तडाखा देण्यासाठी उचललेले पाऊल पुष्कळ काही सांगून जाते. नारी शक्ती जागृत झाली की चुकीच्या गोष्टींना कसा चाप लावता येतो, हे यावरून कळते. दारूचे व्यसन करण्यामध्ये पुरुष मंडळी आघाडीवर असल्याने घरातील स्त्री वर्गाला त्याचा मनस्ताप होतो. कामाचा क्षीण घालवण्यासाठी आम्ही दारू पितो, असे एक ठोकळेबाज उत्तर काही दारुड्यांकडून दिले जाते. असे आहे तर दारू प्यायल्यावर जो धिंगाणा केला जातो आणि त्यामुळे जो मानसिक, प्रसंगी शारीरिक त्रास स्त्री वर्गाला सोसावा लागतो.
त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय करायला हवे? याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. कामाचा क्षीण वगैरे सगळी नाटकं आहे. काहीजण दिवसभर नशेत असतात, तर काहीजण सायंकाळी झिंगू लागतात. दारुडा पती, मुलगा, सासरा आदी सर्वांचे नखरे स्त्री निमूटपणे सहन करत असते. काम करणाऱ्या माणसाला शांत झोप येण्यासाठी दारू प्यावी लागत नाही. त्याला अंथरुणावर पडल्यावर तत्काळ झोप येते. दारू हे काही टॉनिक नाही की रोज सेवन केले आणि त्यामुळे तब्येत सुधारते, रोग प्रतिकार क्षमता वाढते. दारूच्या व्यसनासह अनैतिक नादही जडतात आणि त्या व्यक्तीची वाटचाल दारू सोबत अनैतिकतेकडे अशी होते. एकंदरीत शारीरिक, आर्थिकदृष्ट्या व्यक्ती पूर्णपणे बादच होते.
लुधियाना (पंजाब) येथील एका 15 वर्षीय मुलाने दारूसाठी जन्मदात्या आईची हत्या केली. मुलाचे वय आणि त्याने केलेले कृत्य नक्कीच भयंकर आहे. मित्रांसह दारू पिण्यासाठी आईकडे त्याने पैशाचा तगादा लावला होता. आईने त्याला पैसे दिले नाही. ती रात्री झोपेत असताना मुलाने तिची हत्या केली. त्यावेळी मुलाचे वडीलही घरात होते. मात्र तेही दारूच्या नशेत होते. येथे काही गोष्टी लक्षात येतात. मुलाला दारूचे व्यसन जडण्यास घरातच पोषक वातावरण मिळाल्याने त्या चुकीच्या गोष्टीचा त्याच्यावर संस्कारच झाला असेल, असे येथे दिसते. त्यामुळे घरातील पुरुष मंडळी जे व्यसन करतात, त्याचे अनुकरण करणे मुलांना सोपे जाते.
काही मुले मौजमजा म्हणून पालक घरी नसताना वडिलांची दारू पिऊन पाहतात आणि त्यामुळे काय वाटते, याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. आता अशा स्थितीत दारू पिण्यासाठी कुठे बाहेर जावे लागले का? तर नाही. उलटपक्षी घरातच दारू उपलब्ध झाली. असे किती कुटुंबात होत असेल? उच्चवर्गात तर अशा गोष्टी किरकोळ असतात पण मध्यम आणि गरीब वर्गातील कुटुंबाची वाताहात करणाऱ्या असतात.