बांगलादेशने व्यक्त केली चिंता
ढाका : नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) हे भारताचे अंतर्गत मुद्दे असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे. मात्र, भारतात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शेजारी देशांवर होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली आहे.
भारतात नागरिकत्व दुरूस्ती कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजांच्या सदस्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. त्या कायद्याच्या विरोधात भारतात निदर्शनांचे सत्र सुरू झाले आहे.
त्यापार्श्वभूमीवर, बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए.के.अब्दुल मोमेन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या देशाची भूमिका मांडली. संबंधित कायदा आणि प्रस्तावित एनआरसी आमचे अंतर्गत मुद्दे आहेत.
काही कायदेशीर आणि इतर कारणांमुळे त्याबाबत पाऊले उचलण्यात आल्याचे भारत सरकारने आम्हाला नमूद केले. त्याचा कुठलाही परिणाम बांगलादेशवर होणार नसल्याची ग्वाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दिली.
आमचा भारतावर विश्वास आहे, असे मोमेन म्हणाले. मात्र, बांगलादेशला वाटणारी चिंता व्यक्त करताना त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, अमेरिकेत आर्थिक मंदी आल्यावर त्याचा परिणाम अनेक देशांवर होतो.
कारण, आपण एका जगात राहतो. बांगलादेश हा भारताचा पहिल्या क्रमाकांचा मित्र आहे. पण, भारतात अनिश्चितता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम नक्कीच शेजाऱ्यांवर होऊ शकतो. ती बाब निश्चितच चिंतेची आहे. अर्थात, सध्याच्या स्थितीतून भारत बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.