नवी दिल्ली: स्थलांतरित नागरिकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे विदेश राज्यमंत्री मुरलीधरन यांनी सांगितले आहे. नोंदणी नसलेल्या एजन्सींकडून अशा स्थलांतरित नागरिकांना बेकायदेशीरपणे विदेशात पाठवणाऱ्या एजन्सींना लवकरात लवकर ओळखून त्यांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. प्रोटेक्टर्स ऑफ अमिरातीच्या तिसऱ्या वार्षिक परिषदेमध्ये ते बोलत होते.
गेल्या सहा वर्षांपासून रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र तरीही स्थलांतरित नागरिक विदेशात जाण्यासाठी बेकायदेशीर एजन्सींची मदत घेत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
फसवणूक, अवैध मार्गांनी परदेशात स्थलांतर आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. अशा सर्व गैरमार्गांना आळा घालण्यासाठी आणि परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार लवकरच एक सर्वसमावेशक इमिग्रेशन मॅनेजमेंट सिस्टीमसाठीचे विधेयक आणणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतातून उच्च कुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळ जगातील अन्य देशांमध्ये फार पूर्वीपासून उपलब्ध करून दिले जात आहे. या सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही सरकारची प्राथमिकता आहे, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.