मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमीपणे कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यभरात 5 हजार 71 रुग्णांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई मंडळात सर्वाधिक 4242 एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.
सोमवारी सोडण्यात आलेल्या 5071 रुग्णांमध्ये मुंबई मंडळात 4242 (आतापर्यंत एकूण 39 हजार 976) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 568 (आतापर्यंत एकूण 8430), नाशिक मंडळात 100 (आतापर्यंत एकूण 2365), औरंगाबाद मंडळ 75 (आतापर्यंत एकूण 1945), कोल्हापूर मंडळ 24 (आतापर्यंत एकूण 1030), लातूर मंडळ 11 (आतापर्यंत एकूण 444), अकोला मंडळ 22 (आतापर्यंत एकूण 1048), नागपूर मंडळ 29 (आतापर्यंत एकूण 811) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.