पुणे -“खडकवासला, नांदेड, पानशेत, वेल्हा परिसरात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता आणि गुणतपासणी विभागाकडून तपासणी करून कामाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे,’ असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
विधानसभेमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला चव्हाण उत्तर देत होते. हायब्रिड ऍन्युटी योजनेअंतर्गत सिंहगड रस्त्यावरील विविध ठिकाणी 76 किलोमीटर रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, दीड वर्षानंतर केवळ 30 टक्के कामे झाली आहेत.
यावेळी चव्हाण म्हणाले, “सप्टेंबर 2020 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, विविध सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे कामाची गती संथ झाली आहे. मुदतीत काम होईल की नाही हे बारकाईने तपासावे लागेल. वेग देण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेऊ. आमदार मिसाळ म्हणाल्या, “ठिकठिकाणी खोदकाम केल्याने नागरिक श्वसनाच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.’