वाहन चालकांना 18 कोटींचा दंड; सोळा कोटींचा दंड थकीत
पिंपरी – पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शहरातील वाहतुकीला शिस्तप्रिय बनविण्यासाठी उचललेले पाऊल यशस्वी ठरत असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
गेल्या वर्षभरामध्ये 72 हजार 232 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर 17 कोटी 77 लाख 88 हजार 300 दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी दोन कोटी सात लाख 27 हजार 700 रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर 15 कोटी 70 लाख 60 हजार 600 रुपयांचा दंड थकीत असून तो वसूल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्तांनी हाती कारभार घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वाहतुकीच्या नियमनाला त्यांनी प्राधान्य दिले. हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यात त्यांना यश आले त्यानंतर वाकड येथील भूमकर चौक, डांगे चौक, भोसरी आणि चाकण आदी ठिकाणचीही वाहतूक कोंडी दूर करण्यात आली.
त्यासोबतच त्यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. नो एंट्रीतून येणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या पोलिसांना बक्षीसही जाहीर केले.
दंड वसुलीसाठी विशेष मोहीम
गेल्या काही दिवसांपासून थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दर शनिवारी आणि रविवारी दहा ठिकाणी नाकाबंदी करून विशेष मोहीम राबवली जात आहे.
एक राज्य एक चलन अंमलात
एक राज्य एक चलन या शासनाच्या योजनेत 16 फेब्रुवारीपासून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीसही जोडले गेले आहेत. यामुळे वाहन चालकांना राज्यात कुठेही दंड भरता येणार आहे.
बहुतांश वाहन चालक अनभिज्ञ
नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांना थांबवू नका तर त्यांचा फक्त नंबर नोट करा, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना केली. त्यानुसार शहरातील विविध चौकात थांबलेल्या साध्या वेशातील पोलिसांच्या टीमने नियमभंग करणाऱ्या अनेक वाहन चालकांचे नंबर टिपून घेतले. काही वाहन चालकांना दुहेरी दंडही केला आहे. त्यामुळे आपण नियमभंग केल्याचे बहूतांश जणांना माहितीही नाही. आता या वाहन चालकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे.