सातारा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन राजकीय पक्ष, पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी करणे बंधनकारक आहे. निवडणुकीत उमेदवारांच्या पदयात्रा, प्रचार, उद्घाटन आणि इतर कार्यक्रमांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
परवानगीशिवाय निवडणुकीसंदर्भात कोणताही कार्यक्रम राबवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सातार्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. निवडणूक शांततेत होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची माहिती भोसले यांनी दिली. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. सुधाकर भोसले म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान आणि 4 जूनला मतमोजणी होणार आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात 445 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 303 मतदान केंद्रे ग्रामीण भागात, तर 142 केंद्रे शहरी भागात आहेत.
या मतदारसंघात एकूण मतदार तीन लाख 31 हजार 977 असून, त्यात एक लाख 67 हजार 101 पुरुष आणि एक लाख 64 हजार 848 स्त्री मतदार आहेत. 85 वर्षांवरील चार हजार 938 आणि दोन हजार 327 दिव्यांग मतदार आहेत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी जी विकासकामे सुरू झाली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास परवानगी आहे. मात्र, नव्या विकासकामांना मान्यता देता येणार नाही. निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारात शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना सहभागी होत येणार नाही.