हैदराबाद – महिलांनी केवळ चूल आणि मूल यातच अडकून न पडता विविध क्षेत्रांत नाव कमावले आहे. तसेच आता महिला क्रीडाक्षेत्रातही यशस्वी होताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी महिलादेखील क्रीडापटू म्हणून नाव कमावतात हे मान्यच केले जात नव्हते. त्यामुळे आता तरी पुरुषी मानसिकता बदलायला हवी, असे आवाहन भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने केले आहे.
पूर्वीची परिस्थिती पाहिली तर त्यावेळी प्रत्येक पालक आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावी यासाठी आग्रही असायचे. मुलांना जरी खेळाची आवड असली तरी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांचे क्रीडाक्षेत्रातील अस्तित्वच संपून जायचे. महिलादेखील जागतिक स्तरावर एक क्रीडापटू म्हणून देशाचे नाव उंचावू शकतात हे आपल्या देशात मान्यच व्हायचे नाही.
पी. टी. उषा, सायना नेहवाल, पी. व्हि. सिंधू यांच्यासह आज देशभरात अनेक महिला क्रीडापटू विक्रमांची शिखरे पादाक्रांत करताना दिसल्या. मात्र, तरीही त्यांना सामाजिक मान्यता आणि पाठिंबा मिळत नव्हता. आज चित्र बदलले आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला आपली यशस्वी घोडदौड करत आहेत. त्यामुळे आता तरी क्रीडाक्षेत्रातील महिलांचे क्रीडानैपुण्य मान्य केले गेले पाहिजे, असे मत सानियाने व्यक्त केले आहे.
साक्षी मलिकसारख्या मला देशासाठी कुस्ती खेळण्याची इच्छा असल्याचे किती मुलींनी सांगितले. एखाद्या महिला खेळाडूच्या हातात टेनिसची रॅकेट किंवा क्रिकेटची बॅट दिसली की आजही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाहीच पण काहीवेळा पालकच त्यांची टर उडवताना दिसतात. हे चित्र बदलले पाहिजे. खेळाडूंना घरातूनच क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीसाठी पाठिंबा मिळतो का असाही प्रश्न पडतो. त्यांनी केवळ घर सांभाळावे हीच अपेक्षा केली जाते. मुळातच महिलांचे वर्चस्व मान्य करण्याची मानसिकता आपल्या देशात नाही, ती बदलायला हवी, असेही सानियाने सांगितले.
पाकिस्तानचा माजी कर्णधार क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी माझा 2010 साली निकाह झाल्यानंतर मलादेखील अनेकदा मुलाखतीत खूपच निराशाजनक प्रश्न विचारले गेले. एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न झाले मग तू आता पाकिस्तानातच राहणार का. मात्र, मी आजही भारताचीच नागरिक आहे. वर्षातील सर्वाधीक काळ मी भारतातच असते. पण माझ्याकडे पाहण्याची अनेकांची दृष्टी खूपच विचीत्र असते. मलाच नव्हे तर देशातील प्रत्येक महिला खेळाडूकडे अशाच नजरेने पाहिले जाते. त्यांचे नैपुण्य, त्यांची कामगिरी तसेच त्यांची प्रत्येक गोष्टीसाठीची मेहनत लक्षातच घेतली जात नाही. असे वातावरण आता तरी बदलले जावे, अशी अपेक्षाही सानियाने व्यक्त केली.
क्रिकेटपटूंप्रमाणे सन्मान व्हावा….
भारताचा महिला क्रिकेट संघ आज जागतिक स्तरावर यशस्वी होत आहे. त्यांच्याकडेही पूर्वी दुर्लक्ष केले गेले होते. मात्र, आता त्यांचा सन्मान केला जातो. महिला संघानेही जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे, त्यासाठी त्यांचे कौतुकही केले जाते. आता पुढील काळात क्रिकेटसह विविध क्रीडाक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिला खेळाडूंनाही सन्मान मिळावा, अशी अपेक्षाही सानियाने व्यक्त केली.