परेदशी नागरिकांना पुरावे सादर करणे असणार बंधनकारक
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार जे स्थलांतरित भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करताहेत त्यांना त्यांच्या आधीच्या देशातील धर्माचा पुरावा देणे बंधनकारक आहे. या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी समाजातील स्थलांतरितांना त्यांनी मागणी केल्यावर भारतीय नागरिकत्व दिले जाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये या सहा समाजातील नागरिक अल्पसंख्य असल्याने त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाण्याची तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे. अर्थात डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या स्थलांतरितांनाच या सुधारित कायद्यानुसार भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल.
सुधारित नागरिकत्व कायद्यात स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी काय नियम असावेत, हे सुद्धा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ठरविण्यात येते आहे. पण सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी संबंधित स्थलांतरितांना त्यांच्या धर्माचा पुरावा सादर करणे आवश्यक असणार आहे. ते ज्या देशातून आले आहेत. तेथील धर्माचा पुरावा त्यांच्याकडे असला पाहिजे. धर्माचा उल्लेख असेल असा कोणताही सरकारी पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, इतर सरकारी दस्तावेज यांचा समावेश आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या या स्थलांतरितांना ते 2015 पूर्वी भारतात आले आहेत. हे सुद्धा कागदपत्रांच्या आधारे पटवून द्यावे लागणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.