पुणे – पासपोर्ट नूतनीकरण न केल्याने नागरिकांना परदेश दौऱ्याला मुकावे लागल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नागरिकांची या प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे मेसेजद्वारे पासपोर्ट धारकांना सूचना देण्यात येत आहे. ज्या नागरिकांची पासपोर्टची मुदत संपत आली आहे, त्यांना सात ते नऊ महिन्यांपूर्वीच नूतनीकरणासाठी अर्ज करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याची माहिती पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांनी दिली.
पासपोर्टची मूदत संपण्याआधीच नागरिकांनी नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने टेक्स्ट मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. ज्या नागरिकांचे पासपोर्टची मुदत संपण्यास सात ते नऊ महिने राहिले आहेत, त्यांना मेसेज पाठवण्यात येत आहेत. ज्यांच्या पासपोर्टची मुदत संपत आली आहे, त्यांनी त्वरीत पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पासपोर्ट धारकांना केले जात आहे.
ताकवले म्हणाले, “पासपोर्टचे नूतनीकरण (रिइश्यू) करून घेतले नसल्याने परदेश दौऱ्यावर जाता आले नसल्याची अनेकदा उदाहरणे घडतात. भविष्यात असे होऊ नये, यासाठी नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या पासपोर्टची मूदत संपत आली आहे का, हे त्यांनी तपासून पाहावे. त्यानुसार पासपोर्ट कार्यालयाकडे पुन्हा नवीन पासपोर्ट काढून घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.’ अर्ज करण्यासाठी नागरिकांनी पासपोर्ट इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइट किंवा “एमपासपोर्ट सेवा’ या अधिकृत ऍपवर अर्ज करावेत, असेही त्यांनी सांगितले.