मुळा व भंडारदरा धरण भरल्याने समाधान
नेवासा तालुका अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
नेवासा – दुष्काळाने पिचलेल्या नेवासेकरांना मुळा धरण 85 टक्के, तर भंडारदरा धरण भरल्याने, तसेच नाशिक येथील धरणे भरून गोदावरी नदी दुथडी भरून वाहात असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाऊस नाशकात व आनंदोत्सव मात्र नेवाशात दिसत असल्याचेच चित्र आज तालुक्यात होते.
नेवासा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. मात्र धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. शेतातील पिकांना पाटातून आवर्तन मिळून उन्हाळ्यात पिके जगतील अशीच चर्चा व जायकवाडी भरू दे अशीच प्राथर्ना करत आहेत. जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग जोरदार असल्याने कोरडेठाक पडलेल्या पाणलोट क्षेत्रात पाणी पाय पसरू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. विसर्गाचा जोर इतका होता की दीड-दोन दिवसांत जायकवाडी मृतसाठ्याच्या बाहेर आले. जायकवाडी धरणातील पाणी पातळी यंदा चिंता जनकबनली होती, तर मुळा धरणाने तळ गाठला होता. मुळा भरून जायकवाडी कधी भरेल, हीच चिंता नेवासेकरांना सतावत होती. जुलै संपत आला, तरी पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसात नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत चालली होती.
मात्र पुणे, नाशिक धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून बरसात असलेल्या पावसाने कहर केला. त्यामुळे धरणे ओव्हर फ्लो झाले. धरणांतून सोडलेल्या लाखाच्या वरील विसर्गाने जायकवाडीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. ती अद्यापही तशीच आहे. अपेक्षेपेक्षा झपाट्याने पाण्याची वाढ होऊ लागल्याने वर्षभरापासून वाळवंट बनलेले क्षेत्र आता कुठे पाण्याने व्यापू लागले आहे. त्यामुळे जायकवाडी क्षेत्रात शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. पाण्याचा पसारा वाढत असल्याने नेवासेकर मात्र जाम खुश दिसू लागले आहेत. आता मात्र परिसराला पावसाची अपेक्षा आहे. अद्याप नेवासा तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरी व कूपनलिका अजूनही अनेक ठिकाणी कोरड्याच आहेत. मात्र आता मुळा धरणही भरले आहे. पाऊसही होईलच, अशी अपेक्षा धरून शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेगाने सुरू केली आहेत.