“दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर बांधकाम विभागाला आली खडबडून जाग
मायणी – मनमाड ते बेळगाव या नियोजित राष्ट्रीय महामार्गावरील मायणी ते दहिवडी या 35 किलोमीटर अंतरांच्या रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊन वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत होता.
याबाबत “दैनिक प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. “दैनिक प्रभात’मुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त करत “प्रभात’चे अभिनंदन केले.
खटाव-माण तालुक्यातून सांगली व पुणे जिल्ह्यात जाणार राज्यमार्ग क्रमांक दहा गतवर्षी मनमाड ते बेऴगाव असा राष्ट्रीय महामार्ग करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला पण या तीन वर्षात या मार्गावरील खड्ड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले होते. फलटण माण तालुक्यांच्या तुलनेने खटाव तालुक्यातील या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.
यामध्ये सूर्याचीवाडी, बनपुरी, कातरखटाव, बोंबाळे, तडवळे या गावातून जाणाऱ्या या मार्गावर सहा इंचापासून एक फुटापर्यंत शेकडो खड्डे पडले होते. रस्त्याची अवस्था अतियश दयनीय झाल्यामुळे वाहनचालक रस्ता सोडून साइट पट्टीचा वापर करावा लागत होता. समोरून येणाऱ्या वाहनाला नेमके वाहन कसे चालवायचे याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत होते.
दोन दिवसापूर्वी “दैनिक प्रभात’ने या मार्गावर शेकडो खड्डे असल्याचे वृत्त प्रसिद्ध करत बांधकाम विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून वाहनधारकांनी “दैनिक प्रभात’ला धन्यवाद दिले आहेत.