हरभरा, गहू पिकांची मळणी सुरू
केडगाव-अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या भितीमुळे केडगाव (ता. दौंड) परिसरात शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी धावपळ करत असल्याचे दिसून येत आहे.
जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश आणि राज्यातील वातावरण सध्या गढूळ बनले आहे. तरी शेती केल्याशिवाय पर्याय नाही असे चित्र राज्यात दिसत आहे.
भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतीतील कामांची सध्या लगबग सुरू आहे, यातच मागील चार दिवसांपासून केडगाव परिसरात वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले काही ठिकाणी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काढणीच्या टप्प्यात आलेला गहू आणि हरभरा पिकांच्या मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. काही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला परंतु काहींनी मिळेल ते पीक पदरात पाडून घेण्याच्या विचाराने गहू आणि हरभरा पिकांच्या काढणी आणि मळणीला सुरुवात केली आहे. मळणी झालेला गहू पावसामुळे पांढरा पडला आहे. त्यामुळे बाजारभाव कमी मिळून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. सद्या कामे वेगात सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.