मुंबई – ओमायक्रॉनच्या बाबतीत अनेक संभ्रम असल्याने राज्य सरकार या विषाणूला गांभीर्याने घेत आहे. ओमायक्रॉन हा नवीन विषाणू असल्याने यात अनेक मतमतांतरे आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि देशातील आरोग्य विभागाने याविषयी सूचक मार्गदर्शन केल्यास लोकांमधील गैरसमज थांबतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांपुढे व्यक्त केले.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. देशात तसेच राज्यात लसींचा साठा मुबलक प्रमाणात असूनही जनता लसीकरणाला गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सरकारी यंत्रणा लसीकरण मोहीम व्यापकपणे राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात मुंबई, पुणे यांसारख्या शहरात पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून दुसरा डोस बाकी असणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे.
लोकांनी लसींचे दोन्ही डोस घ्यावे यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती करणे, काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची बंधने आणून दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही अजित पवार म्हणाले.