मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या वक्तव्यांचा समाचार देखील घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या या मागणीला सहमती दर्शविली आहे.
आता या मागणीवरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”. असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले,’मात्र आम्ही कधीच यावर तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत’ असं म्हणत अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर आरोप केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले. तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. मात्र या आवाहनाला आझमी यांनी जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वसही व्यक्त केला.