शहरातून गावात येऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर एखाद्याला काही शारीरिक त्रास सुरू व्हावा आणि तपासणीत तो “करोना पॉझिटिव्ह’ आढळावा, अशा घटना सध्याच्या परिस्थितीची अनाकलनीयता वाढवणाऱ्या आहेत हे खरं; पण त्या घडू लागल्या आहेत. काही व्यक्ती संकटाची तीव्रता वाढण्यापूर्वीच गावी पोहोचल्या होत्या. त्यापैकी अनेकांनी क्वॉरंटाइनचे नियमही पाळले असतील. त्यामुळे आता धोका टळला असे वाटत असतानाच संकट कोसळणे अनपेक्षित आहे. त्यातच लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असताना लोक मोठ्या संख्येने आपापल्या घरी जात असल्यामुळे नेमके काय परिणाम होतील, ही धास्ती आहेच. राजकीय आरोप-प्रत्यारोप होणं स्वाभाविक होतं आणि तसे ते झालेही; पण आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन हे संकट सर्वांनाच अनाकलनीय आहे, हे मान्य करावंच लागणार आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ आज करोनावर औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करताहेत. या विषाणूचं स्वरूप, वाढ आणि प्रवास जाणून घ्यायचा प्रयत्न करताहेत; पण त्यांना मिळणारे यश खूपच मर्यादित आहे. मानवी पेशीत शिरलेल्या विषाणूला लक्ष्य केल्यास शरीरातील निरोगी पेशींनाही धोका उत्पन्न होत असल्यामुळे या विषाणूवर हुकमी उपचारपद्धती अजूनही विकसित झालेली नाही. या संकटाने आपल्या देशाचे दरवाजे प्रथम ठोठावले, त्याला आता दोन महिने उलटून गेले. एखादा गंभीर विषय इतके दिवस अनाकलनीय राहिल्याचे आपण बहुधा प्रथमच पाहात आहोत.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा पूर्ण होऊन चौथा टप्पा सुरू झाला आहे. चौथ्या टप्प्यापासून नियमांमध्ये काही महत्त्वाचे फेरबदल होणार आहेत. परिस्थितीच अशी बिकट आहे की, आपल्या एका बाजूला मृत्यू आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवन आहे. जीवन सुरू ठेवायचे असेल, तर अर्थचक्र फिरते राहायला हवे आणि अर्थचक्राला गती द्यायला जावे तर मृत्यूचा धोका समोर आहे. अशा विश्वव्यापी साथी यापूर्वी आल्याच नाहीत असं नाही. अनेकदा याहून अधिक बळी गेले आहेत; परंतु त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यातील फरकाचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे, आजच्या इतका वेग त्यावेळी जीवनाने पकडलेला नव्हता.
स्पॅनिश फ्लू येऊन गेला, त्याला एकशे दोन वर्षे उलटून गेली. बळींच्या वाढत्या संख्येप्रमाणेच प्रचंड आर्थिक नुकसान त्याहीवेळी जगाने अनुभवले होते. पण त्यावेळी सगळे व्यवहार थांबणे आणि आजच्या काळात ते थांबणे, यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. दुसरा मुद्दा असा की, तेव्हा लोक एकमेकांशी आजच्या इतके “कनेक्टेड’ नव्हते. आज मिनिटा-मिनिटाला आपल्याकडे नवनवीन माहिती, आकडेवारी पोहोचते आहे. परिस्थितीवर, निर्णयांवर आपण मते मांडत आहोत. संकटानंतरच्या जगाची चित्रे रेखाटत आहोत. पण त्यामुळे परिस्थितीची अनाकलनीयता यत्किंचित कमी झालेली नाही.
आज असंख्य लोक मोठमोठ्या शहरांमधून आपापल्या घरांकडे परतू लागले आहेत. हे सुरुवातीच्या टप्प्यात झाले असते तर योग्य ठरले असते की आता घडतेय तेच योग्य आहे, यावर आपण मतं मांडू शकतो; पण ती बिनचूक असण्याची शक्यता कमीच! अनाकलनीयतेचा आणखी एक टप्पा सुरू होतोय, एवढंच आपण म्हणू शकतो. टप्प्याटप्प्यानं व्यवहार सुरू केल्यामुळे काय घडेल, हेही अनाकलनीयच. आव्हान कायम आहे आणि आपला प्रवास सुरू आहे… अनाकलनीयतेकडून अनाकलनीयतेकडे!
– हिमांशू