भारत-चीन सीमा अगदीच अशांत झाली नसली, तरी तिथं तणाव आहे हे नक्की. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठका सुरू आहेत आणि तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न होत आहेत. खरं तर करोनाच्या विषाणूचा जगभर प्रसार झाला तो चीनमधूनच; परंतु त्या कारणावरून संपूर्ण जग चीनवर संतप्त झालेलं असताना चीनला सीमेवर कुरापती काढण्याच्या गोष्टी सुचतायतच कशा, हे कोडंच आहे. एखादा शाळकरी मुलगा दुसऱ्याची खोड काढून तो रडायला लागण्यापूर्वी स्वतःच भोकाड पसरतो, तसं चीनचं वागणं सध्या दिसतंय. विषाणूच्या प्रसाराला जगाकडून आपल्याला जबाबदार ठरवलं जात असल्यामुळे आपल्याला धोका आहे, असं भासवून अशा गंभीर जागतिक परिस्थितही चीनने युद्धसराव वगैरे केला.
काही जाणकार मंडळी या घटनांचा संबंध चीनच्या अंतर्गत परिस्थितीशी जोडतायत. तिथं सरकारविरुद्ध असंतोष वाढत असल्यामुळे उन्माद निर्माण करण्याचं हुकमी अस्त्र म्हणून युद्धखोरीचं प्रदर्शन चीनकडून केलं जात असावं, असं या मंडळींचं म्हणणं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची लाट पुन्हा एकदा आली आहे. “पुन्हा एकदा’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्याचं कारण ही लाट पहिल्यांदा आलेली नाही. डोकलाममध्ये तणाव निर्माण झाला होता, तेव्हाही हीच मानसिकता दिसली; पण टिकली नाही हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूया. कारण पाया कच्चा असता कामा नये.
हा विचार मनात येण्याचं कारण म्हणजे, “ग्लोबल टाइम्स’ या चिनी वृत्तपत्रात भारतातील बहिष्कार लाटेची खिल्ली उडवण्यात आलीय. “भारतीय लोक चिनी वस्तूंशिवाय राहूच शकत नाहीत,’ असा दावा या वृत्तपत्रात छातीठोकपणे करण्यात आलाय. तसं पाहायला गेलं, तर भारतातही या मोहिमेच्या यशाबद्दल साशंक असलेला एक वर्ग आहेच. शिवाय चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणारे मेसेज चिनी बनावटीच्या मोबाइलवरून पाठवले जातात, याबद्दल काहींना वैषम्यही वाटतं. “ग्लोबल टाइम्स’ने मात्र भारतातील चीनविरोधी भावना हा चीनचं नाव खराब करण्याचा डाव असल्याचा थेट आरोप केलाय. अशा वेळी यावरून आपल्या देशात तू तू-मैं मैं होता कामा नये.
चीनविरोधी भावना ही अत्यंत सहज आणि प्रामाणिक आहे, तसाच त्यामागील व्यवहार्यता तपासण्याचा सल्लाही प्रामाणिकच आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आपापसात राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी असा खेळ सुरू होता कामा नये. चिनी विश्लेषकांनी “ग्लोबल टाइम्स’मध्ये केलेले दावे चिनी वस्तूंना भारतीय बाजारपेठ कायम राहील असे आहेत. त्यासाठी स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीसारख्या वस्तूंमध्ये भारतीय बाजारपेठेत चीनचा वाटा किती, याची आकडेवारी त्यांनी दिलीय. शिवाय चीनच्या वस्तू स्वस्त असल्यामुळे भारतीयांना त्यावाचून पर्यायच नाही असं म्हणून मोठी जखम दिलीय.
या साऱ्याला शांतपणे उत्तर देणं आपलं काम आहे आणि म्हणूनच सध्या चीनविषयी निर्माण झालेली भावना अल्पकालीन ठरता कामा नये. “आत्मनिर्भर भारत’ची घोषणा झाली, त्याच दिवशी एक चिनी स्मार्टफोन लॉंचिंगनंतर काही मिनिटांत “आउट ऑफ स्टॉक’ झाला हे कटू वास्तव आहे. दीर्घकालीन तोडगा काढूनच चीनची गुर्मी उतरवणं आपल्याला शक्य आहे. आपल्याकडे प्रतिभांचा तुटवडा नाही, हे करोनाच्या साथीत स्पष्ट झालंय. त्यातूनच उद्याचा स्वावलंबी भारत आकाराला येऊ शकतो.
– हिमांशू