एरव्ही संयमित भाषा अवलंबणारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल अचानक महाराष्ट्र सरकारवर कडक शब्दांत हल्ला चढवताना, “हे सरकार आहे की सर्कस’ अशा स्वरूपाची भाषा वापरली. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करणे स्वाभाविकच होतं, त्यांच्याकडून राज्य सरकारच्या कामाचे कौतुक अपेक्षित नव्हतेच. पण त्यांनी एकदम, हे सरकार आहे की सर्कस अशी भाषा वापरण्याने अनेकांना त्याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहिले नाही. सरकार आणि सर्कस असा अनुप्रास साधायचा त्यांचा प्रयत्न असावा. ही नेहमीची भाजप शैली आहे.
विरोधकांवर बेफाम आरोप हे त्यांचे पूर्वीपासूनच वैशिष्ट्य राहिले आहे. अन्यथा राज्य सरकारच्या कामात त्यांना नेमकी सर्कस कुठे दिसली याचा तपशील मात्र राजनाथ सिंह यांनी दिला नाही. बहुधा महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांना ही सर्कस वाटत असावी. याखेरीज जादाचा अर्थ त्यातून निघत नाही. पण उद्धव ठाकरे यांनी ज्या शैलीने गेले काही महिने हा कारभार चालवला आहे तो अगदीच कंडम म्हणता येईल असा नाही. उलट एका पाहणीत देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा नंबर लागल्याने त्यांचा उत्साह वाढलेलाच दिसला आहे. महाराष्ट्रातील करोनाचेरुग्ण वाढले आहेत. तथापि, ही वाढ जितकी अपेक्षित धरली गेली होती, त्याच्या तुलनेत खूपच कमी असल्याने खुद्द आयसीएमआर या राष्ट्रीय संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या करोना नियंत्रणाच्या कामाची तारीफ केली आहे.
एवढेच नव्हे तर या महाराष्ट्र मॉडेलचे अन्य राज्यांनीही अनुकरण करावे अशी शिफारस त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. कारण महाराष्ट्रात रुग्णांच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत आणि आकडेवारीत कसलीही लपवाछपवी केली जात नाही. त्याउलट गुजरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढलेली दिसू नये म्हणून खासगी रुग्णालयांना चाचण्या घेण्यासच बंदी घातली जात आहे, असाही आरोप होतो आहे. गुजरात आणि अहमदाबादमध्ये करोना स्थिती हाताळण्यात तेथील सरकारला आलेल्या अपयशाबद्दल तेथील उच्च न्यायालयाने त्या सरकारवर अत्यंत कडक ताशेरे मारले आहेत. त्याकडे राजनाथ सिंह यांनी अधिक लक्ष दिले तर ते अधिक उचित ठरले असते.
किंबहुना गुजरातमधील स्थिती महाराष्ट्रापेक्षा अधिक तत्परतेने हाताळली जात आहे काय याचा दाखला त्यांनी दिला असता तर महाराष्ट्र सरकारपुढे एक आदर्श निर्माण होऊ शकला असता. पण गुजरातच्या स्थितीचे भाष्य सोडून त्यांनी महाराष्ट्रातल्या स्थितीवर भाष्य करण्याने त्यांच्या आरोपात केवळ राजकारण आहे, तथ्य नाही असेच म्हणावे लागते. त्यांच्या स्वतःच्या उत्तर प्रदेशातील स्थितीही किती भयानक आहे याचाही त्यांनी अंदाज घेणे आवश्यक वाटते. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांने एखादे राज्य सरकार चुकत असेल तर त्यावर भाष्य करण्याचा नक्कीच अधिकार आहे. पण नेमका तपशील देऊन जर त्यांनी टीका केली असती तर त्यानुसार सुधारणा करण्यास राज्य सरकारला वाव राहिला असता. पण राजनाथ सिंह यांनी केवळ हवेत तलवारबाजी करून ही सभा ऐकणाऱ्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरण्याचे काम केले आहे.
राजनाथ सिंह यांच्यावर संरक्षण मंत्री या नात्याने सध्या चीनच्या आक्रमणाचा तणाव आहे. या तणावातून बाहेर येण्यासाठी बहुधा ते राजकीय विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करीत असावेत. काल अमित शहा यांच्या भाषणातील एका मुद्द्याला राहुल गांधी यांनी शायरी अंदाजात उत्तर देऊन त्यांची खिल्ली उडवली होती. त्या वादातही आज राजनाथ सिंह यांनी उडी घेतलेली दिसली. त्यांनी कॉंग्रेसच्या “हाताचा पंजा’ या निवडणूक चिन्हाचा संदर्भ देऊन, “हाथ में दर्द हो तो दवा क्या चीज है, हाथ ही जब दर्द हो तो क्या कीजिए’ अशा ओळी राहुल गांधी यांना ऐकवल्या होत्या. राहुल गांधींनीही मग त्यांना आता कविता नको थेट उत्तर द्या, असे आव्हान देत चीनने भारताच्या लडाख परिसरात आक्रमण केले आहे की नाही, असा थेट प्रश्न विचारला आहे. त्याला मात्र राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलेले नाही. राजनाथ सिंह यांचे नेमके दुखणे काय आहे, हेही कालच्या त्यांच्या भाषणातून दिसले आहे. त्यांनी भाषणाच्या ओघात शिवसेनेने आम्हाला दगा दिला आहे, असे विधान केले आहे.
हातातोंडाशी आलेला त्यांचा घास शिवसेनेने हिरावल्याने आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि समृद्ध राज्याची सत्ता हातची गेल्याने भाजप धुरिणांची जी अवस्था झाली आहे त्या नैराश्यापोटीच त्यांनी इतक्या कडक भाषेत तक्रार केली असावी. सिंह यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवाब मलिक यांनी दिलेले उत्तरही चपखल आहे. महाराष्ट्रातील सरकार पूर्ण लोकशाही पद्धतीने सुरू आहे, या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत, हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असे खडेबोल त्यांनी ऐकवले आहे. सोशल मीडियामुळे राजकारण्यांची जिथल्या तिथे उत्तर देण्याची सध्या चांगली सोय झाली आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस तसेच शिवसेनेचे लोकही आता भाजपच्या आरोपांना जिथल्या तिथे प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राला करोनाच्या संबंधात पुरेशी मदत देत आहे, असाही दावा सिंह यांनी केला असला तरी करोनासाठीची वेगळी मदत महाराष्ट्राला आलेली नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. केंद्र-राज्य संबंधानुसार जो निधी राज्यांना देणे बंधनकारक आहे तो निधी देण्यातच केंद्र सरकारकडून चालढकल सुरू आहे, असा आरोप सध्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारकडून सुरू आहे.
त्यावरही मोघम बोलण्यापेक्षा राजनाथ सिंह यांच्यासारख्यांनी सत्य आकडेवारी सांगून आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते. काल सिंह यांना ही संधी होती, पण त्यांनी मोघम विधाने करून वेळ मारून नेली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी असणाऱ्या सिंह यांनी चीनच्या आक्रमकतेची अधिक चिंता करावी. सीमेवरील स्थितीबाबतही त्यांनी देशवासीयांना विश्वासात घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पक्षीय राजकारणासाठी एरवी भरपूर वेळ मिळू शकतो, पण चिनी आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर सिंह यांच्यासारख्या जबाबदार व संयमी नेत्याने सध्या देशांतर्गत राजकारणात आपला नाहक वेळ घालवणे देशाला परवडणारे नाही एवढेच या निमित्ताने सुचवायचे आहे.