हिमांशू
आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी चीनबाबत चर्चा होतच असते. कधी सीमावर्ती प्रदेशात केलेल्या कथित अतिक्रमणावरून तर कधी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या निमित्ताने. कधी सागरी मार्गाने चीन राबवित असलेल्या विस्तारवादी धोरणावरून तर कधी चिनी ऍपवर बंदी घालण्याच्या निमित्ताने.
करोनाच्या उद्रेकानंतर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चीन हाच एकमेव चर्चाविषय ठरला. कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी दिवसातून एकदा आपली आठवण जगातल्या सर्वांना यावी, अशीच मेख चीनने मारून ठेवलीय. चर्चेसाठी अगदीच काही विषय नाही, अशी वेळ आली तरी चीनच्या लोकसंख्येचा विषय तरी भारतात हमखास चर्चिला जातोच.
चीनची लोकसंख्या आठवली की, आपल्याला त्यातल्या त्यात हायसं वाटतं. कुणीतरी या बाबतीत आपल्याही पुढे आहे, हे जाणवून दिलासा मिळतो. परंतु सध्या चीन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय आणि तो विषय आहे तिथल्या तरुणांच्या मानसिकतेचा.
करोनासारखा या मानसिकतेचा फैलावसुद्धा जगभर होईल की काय, अशी शंका अनेकांना आहे. लग्नच करायचं नाही, अशा मानसिकतेचा “संसर्ग’ तिथं वेगानं पसरू लागलाय. गेल्या वर्षीच्या लग्नसराईत जेवढे विवाह झाले, त्या तुलनेत यंदा झालेल्या विवाहांची संख्या कमी आहे, असं निरीक्षण चीन सरकारच्या संबंधित विभागाने नोंदवलंय.
विवाहाची नोंदणी होण्याच्या प्रमाणावरून ही संख्या समजते आणि नोंदणी यंदा खूपच कमी झालीय. विशेष म्हणजे लग्नाच्या प्रमाणात घट होण्याचा गेल्या दोन वर्षांतील करोनाच्या फैलावाशी काही संबंध आहे, असं वाटत असल्यास तो निव्वळ भ्रम आहे. कारण ही घसरण गेल्या सात वर्षांपासून चाललीय. तरुणांना लग्न करण्यात रसच राहिलेला नाही, असं सांगितलं जातंय.
लग्न ही एकंदरीतच खर्चिक बाब आहे आणि स्वतःचं घर असणं लग्नासाठी आवश्यक असल्यामुळे चिनी तरुण हल्ली लग्नच नको म्हणू लागलेत. चीनमधल्या सांख्यिकी विभागाच्या म्हणण्यानुसार, लग्नाबद्दल अनिच्छा वाटण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, कामाचा प्रचंड ताण. या बाबतीत मात्र सर्वांचेच कान उभे राहायला हवेत, अशी स्थिती आहे. एकंदरीतच जगभरात कामाचे तास आणि ताण या दोन्ही गोष्टी वाढत आहेत.
“टार्गेट’ किंवा “डेडलाइन’च्या दबावाखाली काम करणाऱ्यांना लग्न ही ब्याद वाटणं खूपच स्वाभाविक आहे. याखेरीज चीनमधील महिलांचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. त्यामुळेही लग्नांची संख्या कमी होत आहे,
असं सांगितलं जातंय. स्त्री-पुरुष लैंगिक गुणोत्तरात असंतुलन असणं हेही लग्नं कमी होण्याचं कारण आहेच. एकूण काय, तर सबब कोणतीही असली तरी लग्न करायचंच नाही, असा निर्णय घेणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढायला चीनमध्ये सुरुवात झालीय.
तसं पाहायला गेलं तर जगात अनेक ठिकाणी आता तरुणांमध्ये ही मानसिकता बळावत चाललीय. अगदी आपल्याकडेही अनेक कारणांनी लग्नाकडे पाठ फिरवणाऱ्यांची संख्या वाढतेय. कौटुंबिक, सामाजिक रचनेमुळे, दबावामुळे पोरं-पोरी बोहल्यावर उभं राहायला तयार होत असली,
तरी व्यवहारवादी मानसिकतेच्या अतिरेकाने विवाहसंस्थेच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह उभं केलंय का, असाही प्रश्न उपस्थित करता येईल. कारणे काहीही असोत, लग्न टाळण्याच्या नव्या व्हेरिएन्टचा हा “संसर्ग’ केवळ चीनमध्येच पसरतोय असं नव्हे.