स्थानिक लोकांनाच नोकऱ्यांत प्राधान्य हे तत्त्व अमान्य
नवी दिल्ली, दि. 28 – नोकऱ्या देताना स्थानिक लोकांनाच त्या मिळाव्यात यासाठी काही राज्यांत जी चळवळ चालू आहे, तिला केंद्राचा विरोध आहे. कारण त्यायोगे राष्ट्रीय एकात्मतेच्या कल्पनेलाच हरताळ फासला जातो, असे केंद्र सरकारचे मत आहे. आज राज्यसभेत उपगृहमंत्री मोहसीन यांनी भाषिक उल्पसंख्य चौकशी मंडळाच्या 13 व्या अहवालावरील चर्चेस उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, राज्यांना असे सांगण्यात येईल की, नोकऱ्या देताना प्रादेशिक भाषा उमेदवाराला अवगत असलीच पाहिजे ही अट घालू नका. भाषिक उत्पसंख्यकांना पुरेसे संरक्षण दिले जावे, त्यांच्या हक्कांची जपणूक व्हावी यासाठी सरकार जरूर ती उपाययोजना करील. नेपाळी भाषेला घटनेच्या भाषाविषयक 8 व्या परिच्छेदांत समाविष्ट करणे शक्य नाही असाही खुलासा त्यांनी केला.
महात्मा फुलेंच्या विचारांची आज जरूरी – पु. ल. देशपांडे
पुणे – सध्या बहुजन समाजाचे नेते म्हणविणाऱ्यांनी बहुजन समाजाशी नातेच तोडले आहे. समाजात अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून महात्मा फुलेंच्या विचारांची सध्या फार जरूरी आहे, अशा आशयाचे उद्गार पु. ल. देशपांडे यांनी काढले. एक द्रष्टा या शब्दात देशपांडे यांनी म. फुलेंचे वर्णन केले. फुले म्हणजे गुरूंचे गुरू. ते पहिले सत्यशोधक.
त्यांनी जणू पेटते निखारे हातावर घेतले होते. म. फुलेंच्या काळातील समाजस्थितीचे वर्णन करताना पु. ल. म्हणाले, ती “गप्प बसा’ संस्कृती होती. गतजन्म, पूर्वपुण्याई वगैरे कल्पना ज्या मूर्खाने काढल्या, त्याने या भारताचा सत्यानाश केला. जन्माने श्रेष्ठ कनिष्ठपणा ठरणे ही पद्धत सर्वात घातक ठरली. अलीकडच्या इतिहासातील ते पहिले महापुरुष होते की ज्यांना “असे का?’ हा प्रश्न पडला आणि त्यांनी तो निर्भीडपणे विचारला.