– हिमांशू
दूरस्थाः पर्वताः रम्याः या श्लोकात ‘युद्धस्य तु कथा रम्या’ असा उल्लेख का केलाय, हे युद्ध प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळत नाही. डोंगर जसे दुरूनच साजरे दिसतात, तसंच युद्धाच्या कथाही ऐकायलाच बर्या वाटतात. पडद्यावर युद्धपट पाहून आपले बाहू स्ङ्गुरण पावतात. कारण बहुतांश चित्रपटांत आपल्या जवानांनी शत्रूला ‘बॉर्डर’वर रोखलेलं असतं. आजकाल तर एकटा ‘व्हीएङ्गएक्स हिरो’ शत्रूच्या हद्दीत शिरून त्यांची दाणादाण उडवून सुखरूप परतताना दिसतो. पण युद्ध म्हणजे काय, हेही ठाऊक नसण्याच्या वयात अगदी जवळ कुठेतरी एखाद्या क्षेपणास्त्राचा धमाका होतो, तेव्हा त्या कोवळ्या जिवाला कसं वाटत असेल?
युद्धनीती’ वगैरे धाब्यावर बसवून, माणुसकीचे सगळे संकेत झुगारून नागरी वस्त्यांवर सर्रास बाँबवर्षाव करणार्यांना ही कोवळी पोरंही जेव्हा दिसत नाहीत, तेव्हा माणूसजातीला मिळालेल्या नैसर्गिक विचारशक्तीविषयी शंका वाटायला लागते. इस्रायल-हमास युद्धात इराणची एन्ट्री झाल्यामुळे आता काय-काय पाहावं लागेल, या चिंतेनं जग हादरलंय. इराणपाठोपाठ आणखी कोणते देश युद्धात उतरतील किंवा ओढले जातील? तिसरं महायुद्ध सुरू होईल का? अशा चर्चा सुरू झाल्यात. युद्धात नसलेल्या देशांमध्येही कोण चूक-कोण बरोबर, याच चर्चा अधिक आहेत. पण ज्यांची चूकच नाही, अशा बालकांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र सामसूमच आहे.
इस्रायल-हमास संघर्षाच्या सहा महिन्यांत 13 हजार मुलं दगावली. रशिया-युक्रेन युद्धात पाचशे लहानग्यांचा मृत्यू झाला. भाजून, दबून, चेंगरून मरण्याचं हे वय आहे का? युक्रेनमधल्या हजारो मुलांचं अपहरण झाल्याचंही सांगितलं गेलंय. युद्धात दगावणार्या मुलांपेक्षा अनाथ होणार्या मुलांचा आकडा कितीतरी पटींनी जास्त असतो. या मुलांनी आपले आईवडील, नातेवाईक संपताना उघड्या डोळ्यांनी पाहिलेत. त्यांच्या आजूबाजूला सतत स्ङ्गोट होताहेत.
परिसरात गोळीबार चाललाय. तहानेनं व्याकूळ झालेल्या पोरांना पाणी देणारं कुणी नाही. भूक लागली तर कुणाला सांगायचं, कळत नाही. डोक्यावर घरघरणारं हेलिकॉप्टर आपल्यासाठी मदत घेऊन आलंय की मृत्यू, हे कळायला मार्ग नाही. युक्रेनमध्ये लाखो मुलांवर झालेले युद्धाचे मानसिक परिणाम कसे पुसायचे, हे मानसतज्ज्ञांनाही समजेनासं झालंय.
ही मुलं ‘स्ङ्गोट झाला’ म्हणून ओरडत झोपेतून जागी होतात. कर्कश्य सायरन ऐकून दचकतात. स्ङ्गोटामुळे जळलेल्या दारूगोळ्याचा वास त्यांच्या नाकात घर करून बसलाय. बालसुलभ भावना त्यांच्या चेहर्यावर उमटत नाही. ‘निरागस’ म्हणता म्हणता पोरं प्रौढ दिसू लागलीत. शाळा सुटली नशिबाची पाटी ङ्गुटली, अशा अवस्थेमुळे त्यांच्या नजरा भकास झाल्यात.
जगभरात चाललेले संघर्ष आणि त्यात होरपळणारे हे केविलवाणे जीव. ज्यांना नावही धड सांगता येत नाही, अशी मुलं वंशवादानं मरतायत. सोमालयाच्या गृहयुद्धात शाळांवर हल्ले करून मुलांना बंदुका दिल्या जाताहेत. सीरिया, अङ्गगाणिस्तानातल्या मुलांची अवस्था वेगळी नाही. आंतरराष्ट्रीय नियम कोणते आणि ते पाळण्याची जबाबदारी कुणाची, एवढ्यावर ही चर्चा संपू शकत नाही. डोळ्यात अगतिकता, मनात शोक आणि मेंदूत चीड घेऊन वाढणारी ही मुलं जगाला कशी सामोरी जातील, कशी प्रतिक्रिया देतील, हे प्रश्न कोण सोडवणार?