औरंगाबाद – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारवर शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याची विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर खोके घेतल्यावरून टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे भिकार** म्हटल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच महिलेबाबत गलिच्छ भाषेत टीका केल्याने राज्यभरातून सत्तार यांच्या वक्तव्यावर टीका होत आहे. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘महिलांबद्दल असे काही बोललो नाही. मी महिलांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. महिलांचा जर अनादर झाला असेल तर मी माफी मागतो.’ अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
दरम्यान, सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असे देखील राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी ही मागणी केली आहे.
अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलाबद्दल आदरयुक्तपणे टीका केली पाहिजेअसे मुंडे यांनी म्हटले आहे. तर अब्दुल सत्तारांची मस्ती उतरवू, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानंतर मंत्रालयाची सुरक्षा वाढवली आहे. मंत्रालय परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मंत्रालयाच्या मेन गेटवर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे कार्यकर्ते मंत्रालयावर धडकण्याची शक्यता असल्यामुळे त्याआधीच पोलीसांनी मंत्रालयाला दिला पहारा दिला आहे. सत्तार यांच्या वक्तव्यानंतर आता राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.