मुंबई – बॉलिवूड अभिनेता अमिर खान (Aamir Khan) व पत्नी किरण (Kiran Rao) यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडली आहे. आमिर आणि किरण गेल्या पंधरा वर्षापासून एकमेकांसोबत आहेत. घटस्फोटाचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतल्याचे बोलले जात आहे. यांसंदर्भातील एक ऑफिशिअल स्टेटमेंट सुद्धा पोस्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अनेकांनी आमिर-किरणच्या या निर्णयाचा आदर केला. पण ट्रोल करणाऱ्यांचीही कमतरता नव्हती. अनेकांनी या दोघांनाही ट्रोल करण्यास सुरूवात केली. मात्र, प्रसिद्ध चित्रपट निर्माते ‘रामगोपाल वर्मा’ (Ram Gopal Varma) यांनी ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे.
“घटस्फोट घेण्याचा निर्णय आमिर व किरण यांचा स्वत:चा निर्णय आहे. मग इतरांना अडचण का आहे? यावरून किरण व आमिर यांना वैयक्तिक ट्रोल करणारे मूर्खपणा करतायत. त्या दोघांचा निर्णय अतिशय खासगी व प्रोफेशनल आहे’. अशा आशयाचे ट्वीट राम गोपल वर्मा यांनी केलं आहे.
तसेच आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी आमिर व किरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आमिर-किरण तुमचं आयुष्य आधीपेक्षा अधिक ‘रंगीन’ होईल, अशी कामना मी करतो. माझ्या मते, लग्नापेक्षा घटस्फोट अधिक चांगल्याप्रकारे सेलिब्रेट व्हायला हवा. कारण घटस्फोट हा विचारांती घेतलेला निर्णय असतो..’ असं त्यांनी म्हटलं आहे.