भाष्य (सुनील राऊत) – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात विधानसभानिहाय आढावा बैठक घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेत पवार यांनी “आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; पण तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेऊनच कामाला लागा.’ असा सल्ला राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच पक्षवाढीसाठी ही तयारी करावीच लागते असेही माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आधी शिवसेना, नंतर कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीही निवडणुकांची तयारी स्वबळावर करण्याच्या मार्गावर असल्याने महाविकास आघाडीचे राज्यातील धागे स्थानिक पातळीवर कच्चे होऊ लागल्याचे चित्र आहे.
शहरात कॉंग्रेस आणि शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीएवढी नाही. त्यामुळे स्वबळावर लढलो, तरच फायदा आहे, असे शहर पदाधिकारी खासगीत सांगत असतानाच, पवार यांच्या या भूमिकेने पालिका निवडणुकीमध्ये राजकारण तापणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच पालिका निवडणूक मार्च 2022 मध्ये होईल, हे गृहीत धरून शहरात शिवसेनेकडून 2021 च्या मध्यापासूनच शहरात पक्ष संघटन मजबूत करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडे होती. यावेळी पालिका निवडणुकीसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आघाडीसाठी स्थानिक पातळीवर बैठकाही झाल्या होत्या. मात्र राऊत यांनी शिवसेना पुण्यात 80 जागा लढवेल आणि आघाडीत सन्मानाने जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढू, असा नारा दिला. संघटनेला बळ देण्यासाठी ही घोषणा असली तरी तेथूनच महाविकास आघाडीत खडा पडण्यास सुरुवात झाली.
शिवसेनेनेही “एकलो चलो’ची भूमिका घेतल्याने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरातील कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत पुण्यात स्वबळावर लढणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. ज्या वेळी शिवसेना आणि कॉंग्रेस “एकला चलो’ची भूमिका घेत होती, त्याच वेळी शहराची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने लगेच राष्ट्रवादीचे 120 नगरसेवक निवडून येतील, असे सांगत स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे या तीनही पक्षांत विसंवाद वाढत असल्याचे समोर आले. तर महापालिका निवडणूकाही ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडल्या. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच राज्यात झालेल्या सत्तांतर नाट्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. हे सरकर स्थापन होताना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून थेट या सत्तांतराला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याची टीका करण्यात आली. प्रत्यक्षात शिवसेना (ठाकरे) गटाकडून हे आरोप खोडण्यात आले असले तरी, शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर झालेल्या आरोपांमुळे पक्षात काहीसा नाराजीचा सूर आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस स्वबळाचा नारा वारंवार देत आहे. त्यामुळे 2007 आणि 2012 मध्ये महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने पुण्यात आपली ताकद दाखविण्यासाठी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला आहे.
महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष आम्ही एकच असल्याचे सांगत असल्याने शहरातील पदाधिकारी खासगीत स्वबळाची भाषा करत असले तरी जाहीररित्या बोलण्यास तयार नाहीत. मात्र, आता अजित पवारांनीच आघाडीचा निर्णय काय होईल तो होईल, तुम्ही तयारीला लागा, स्वबळाची तयारी ठेवा, असे आदेशच कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत केवळ शिवसेना आणि कॉंग्रेसचे राज्यातील नेते स्वबळाची भाषा करत होते. मात्र, आता राष्ट्रवादीचीही भाषा बदलू लागल्याने आघाडीचे धागे कच्चे होत असल्याचे चित्र असून, महापालिका निवडणुकीमध्ये यामुळे रंगत निर्माण होणार आहे.