कोकणात नारळ फोडण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडण्यासाठी वापरलं जाणारं सुपरिचित शस्त्र म्हणजे कोयता. परंतु हे शस्त्र आता कुप्रसिद्ध होऊ पाहतंय.
उसाची किंवा शहाळ्याची गोडी चाखण्यासाठी ज्याचा वापर करायचा, त्याचा दहशत माजवण्यासाठी वापर केल्यावर दुसरं काय होणार? काही दिवसांपासून “कोयता’ हा चर्चेचा विषय झालाय आणि सरकारसह राजकीय पक्षांनीही त्याची दखल घेतलीये. अशी दखल तर ऊसतोड करणाऱ्या कोयत्याचीही कधी घेतली गेली नाही. ऊसतोड करायला मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या मजुरांचं पोट भरणारं हत्यार म्हणजे कोयता. ऊसतोड करणारी पती-पत्नीची जोडी म्हणजे “एक कोयता’ असं म्हटलं जातं.
काही वेळा मुलंही आईवडिलांना मोळ्या बांधायला, वाढं वेगळं करायला मदत करतात. अशा मदतनीसांना “अर्धा कोयता’ म्हणण्याची पद्धत आहे, असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. ही माणसं गेली अनेक वर्षे साखर कारखान्यांच्या हंगामात सुमारे सात-आठ महिन्यांसाठी घरापासून दूर राहतात. कुटुंब म्हणून अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. लाखोंच्या संख्येनं पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या या “कोयत्यां’कडे अद्याप म्हणावं तसं लक्ष दिलं गेलेलं नाही. शिक्षणापासून विवाहापर्यंत आणि निवाऱ्यापासून पर्यायी रोजगारापर्यंत असंख्य प्रश्नांनी घेरलेले हे “कोयते’ म्हणजे कष्ट आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण होत. हंगामी फिरस्ती नशिबी आलेले हे “कोयते’ साखरेच्या गोडव्यासाठी कटू अश्रू पितात.
पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातले कष्टकरी लोक कातड्याचा पट्टा कमरेला बांधून तलवार लटकवावी, तसा त्यात कोयता लटकवतात. चुलीसाठी लाकूडफाटा जमवण्यापासून अनेक कामं करणारा हा कोयता म्हणजे काटक डोंगरी माणसाचा “मल्टीपर्पज मित्र’च! हाच कोयता शब्द जेव्हा “दहशत’ या शब्दाला जोडून वापरला जातो, तेव्हा प्रत्यक्ष कोयत्यालाही वाईट वाटत असेल. दहशत माजवण्यासाठी मला एवढं बदनाम का करता, असं कोयता मनोमन म्हणत असेल.
विशेषतः पुणे परिसरात कोयता पुरता कुप्रसिद्ध झालाय. आजी-माजी उपमुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागलीये. पोलिसांनी जप्त केलेल्या कोयत्यांची संख्या शेकड्यांमध्ये आहे. पोलिसांनी काही कोयताधाऱ्यांची “वरात’ काढून त्यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला. काहीजणांना रस्त्यातच चोपही दिला. तरीही कोयता काही म्यान होत नाही. खुनाचा प्रयत्न, धाक दाखवून दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, धमक्या असे गंभीर गुन्हे एका टोळीवर दाखल आहेत. हवेली तालुक्यातही नुकतीच गंभीर घटना घडली. मोटारसायकल हळू चालवा, असं सांगितल्याच्या रागातून कोयते बाहेर निघाले आणि दहशत माजवून दहा जणांची ही गॅंग निघून गेली.
कष्टाळू लोकांचं हत्यार म्हणून प्रसिद्ध असलेला हा कोयता एकाएकी दहशत माजवणाऱ्यांचं हत्यार कसा काय ठरला? कोयत्यानं वाढदिवसाचा केक कापावा, ही इच्छा कुठून उगवली? कोयता हातात घेऊन केल्या जाणाऱ्या श्रमांना किंमत उरली नाही म्हणून तर कोयता रागावला नसेल ना? “तरुणांचा देश’ हे बिरूद मिरवताना तरुणांच्या हातातला दहशतीचा कोयता, तलवार-कोयत्यानं कापले जाणारे केक, पार्किंगमधल्या गाड्या जाळणं या सगळ्याकडे आपण केवळ “कायदा सुव्यवस्थेचा विषय’ म्हणून पाहू शकतो का?