सरकार व इतर पक्षांमधे चर्चा होण्याची वेळ आली
पुणे, दि. 17 – परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी व आणीबाणी लवकर संपुष्टात येण्यासाठी सरकार व संसदेतील पक्ष यांच्यामध्ये सल्लामसलत होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीने केली आहे.
पक्षाच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीच्या चार दिवसांच्या बैठकीच्या काल शेवटच्या दिवशी मंजूर केलेल्या ठरावात म्हटले आहे की, अशा स्वरुपाची सल्ला मसलत करण्याची वेळ आली आहे. राजेश्वर राव यांनी ही माहिती देऊन आणीबाणी शिथिल करण्याच्या पंतप्रधानांच्या उद्गाराबद्दल त्यांनी आभार मानले.
भारत-बांगलादेश सीमा सुरक्षा प्रमुखांची बैठक
नवी दिल्ली – उभयपक्षी हिताचे व संबंधाचे विषयावर भारत व बांगलादेश यांच्या सीमा सुरक्षा प्रमुखांची बैठक डाक्का येथे होईल. भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे डायरेक्टर जनरल अश्विनीकुमार व बांगलादेशाचे मे. ज. दस्तगीर बांगलादेश रायफल्स प्रमुख, हे चर्चेत भाग घेतील.
गोव्यास उच्च न्यायालय असावे
पणजी – गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय असावे, अशी मागणी होत आहे. मडगाव व पणजी येथे दोन वेगळी जिल्हा व सत्र न्यायालये स्थापन करण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात येत आहे.